रमेश कांबळे
अलिबाग: रायगड जिल्ह्यात 2025 ते एप्रिल 2026 या 16 महिन्यात 125 विनयभंगाच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. महिलांवरील, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात कायदे अस्तित्वात असले तरी अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. 2025 ते एप्रिल 2026 या काळात एकट्या रोहा पोलिस ठाण्यामध्ये विनयभंगाचे 16 गुन्हे दाखल आहेत.
खालापूर व कर्जत 12 तर अलिबाग पोलिस ठाण्यात 11 गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात इतर पोलिस ठाण्यातही विनयभंगाचे गुन्हे नोंद असून यामुळे महिलांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला, बालकल्याण समितीच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातच महिलांवरील अत्याचार व विनयभंगाच्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
शहरी,ग्रामीण भागात अल्पवयीन मुली आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी, प्रवासात, बाजारात गर्दीच्या ठिकाणी आणि अगदी घरातही महिलांशी गैरवर्तन किंवा लज्जास्पद कृत्ये घडत आहेत.
महिलांवरील, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात कठोर कायदे अस्तित्वात असले तरी अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. 2025 या वर्षात विनयभंगाचे एकूण 118 तर जानेवारी ते एप्रिल 2026 पर्यत 4 महिन्यांत एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिला व बालकल्याण समितीच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातच महिलांवरील अत्याचार व विनयभंगाच्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बदनामीच्या भीतीने तक्रार करण्यास टाळाटाळ :
अनेक वेळा आपली आणि कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने मुली समोर येऊन तक्रारी देत नाही. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांपेक्षा अत्याचाराचे प्रमाण जास्त असू शकते. महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे वाढलेले प्रमाण हे समाजातील वाढत्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तैनात:
रायगड जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस विभागाने महिला पोलिसांच्या दामिनी पथकाची निर्मिती केली आहे. त्यांना मोटारसायकल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच या पथकाला विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, समुद्रकिनारे आणि गर्दीच्या ठिकाणी या पथकाची नियमित गस्त सुरु असते. या पथकांचे नंबर शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना उपलब्ध करून दिले असून, 112 या नंबरवर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथक घटना स्थळी दाखल होऊ शकेल अशी व्यवस्था आहे. मात्र एवढे प्रयत्न करुनही महिलांसंबंधी गुन्हे कमी झाले नसल्याचे चित्र दाखल गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर दिसून येते.