Rewas Reddi coastal highway project pudhari photo
रायगड

Rewas Reddi coastal highway project : सागरी महामार्ग कोकण विकासाचा गेमचेंजर !

10 हजार कोटींचा मेगाप्रकल्प, 498 किमी किनारी महामार्ग, सात भव्य पूल,

पुढारी वृत्तसेवा

माणगाव : कमलाकर होवाळ

कोकणाच्या किनारपट्टीवर विकासाची नवी क्रांती घडवणारा ‌‘रेवस-रेड्डी सागरी किनारा महामार्ग‌’ हा प्रकल्प आता वास्तवात उतरत आहे. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी 1980 मध्ये दूरदृष्टीने मांडलेल्या या स्वप्नाला तब्बल चार दशकांनंतर राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली. आता प्रत्यक्ष कामांना चांगली गती लाभली असून, कोकणवासीया मध्ये आनंद आणि अपेक्षेचा संगम साकारला आहे. हा महामार्ग केवळ वाहतूक सुलभ करणारा नाही, तर कोकणाच्या आर्थिक, पर्यटन आणि सामाजिक उत्थानाचा आधारस्तंभ ठरेल.

या मार्गातील सर्वांत आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे समुद्र आणि खाड्यांवर उभारले जाणारे सात भव्य पूल: रेवस - करंजा, रेवदंडा, बाणकोट, अगरदांडा, केळशी, कुणकेश्वर आणि जयगड. हे पूल आधुनिक अभियांत्रिकीचे नमुने ठरतील, जे वादळी समुद्राच्या आव्हानांना तोंड देऊन कोकणाच्या किनारी अडथळे दूर करतील.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या पुलांची कामे वेगाने पुढे नेत आहे, तर अलिबाग ते मुरुडपर्यंत रस्त्याचे काँक्रिटी करणही प्रगतिपथावर आहे. गावांच्या बाह्य वळणाने जाणारा हा मार्ग पुनर्वसनाच्या जटिलतापासून मुक्त असल्याने स्थानिक शेतकरी आणि रहिवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे.

अलिकडेच मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि विधान सभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाला अंतिम धक्का देण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मतर - रेवस-करंजा पुलाचा शुभारंभ झाल्याने कामांना अधिक गती मिळाली. 2030 पर्यंत हा संपूर्ण महामार्ग वाहतुकी साठी खुला होईल, अशी अपेक्षा आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय मानकांसह बांधला जात असून, त्यात पर्यावरणीय संतुलन राखण्यावर विशेष भर आहे. तसेच हे फुल बांधताना पूलाचे डिझाईनमध्ये बांधून यात मासे आणि पक्ष्यांच्या प्रवासाला अडथळा येऊ नये याची काळजी घेण्यात येणार आहे.

पर्यटन, उद्योग आणि रोजगारांना नवसंजीवनी मिळणार असून या सागरी किनारा महामार्गामुळे कोकणातील शेकडो पर्यटन स्थळे गणपतीपुळे, मालवण, तारकर्ली, रत्नागिरीचे सुवर्णसंदाना, शिरगावकरांचे वाड्या यांसारख्या पर्यटकांसाठी सुलभपणे उपलब्ध होतील. दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करणारा कोकण आता ‌‘ कॅलिफोर्निया ‌’ सारखा पर्यटन हब बनेल.

यासोबतच मासेमारी, फळप्रक्रिया, रसायन आणि लॉजिस्टिक्स उद्योगांना प्रचंड मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. आणि स्थानिक तरुणांसाठी हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, बांधकामा पासून पर्यटन व्यवसाया पर्यंत कोकणाच्या कृषी अर्थव्यवस्थेला देखील बाजारपेठांशी थेट जोडले जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याची शक्यता आहेच शिवाय त्यांच्या शेतमाल, मच्छीमार व्यवसायिक व दुग्ध व्यवसायालाही गती मिळून बाजारपेठे उपलब्ध होणार आहे.

या महामार्गाला ‌‘ बॅरिस्टर ए. आर. अंतुले सागरी महामार्ग ‌’ हे नाव देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. मोहन दोशी यांनी केली आहे. कोकणचे सुपुत्र कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या दूरदृष्टीचे ऐतिहासिक स्मारक व्हावे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्व काळात कोकण विकासाच्या अनेक योजना राबवल्या गेल्या, त्यापैकी माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत प्रकल्प, लोणेरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, दिघी बंदर, ताम्हिणी घाट मार्ग, असे अनेक प्रकल्पाला त्यांनी प्राधान्य दिले. आणि हा प्रकल्प त्यांच्या वारशाचा सोनेरी अध्याय असेल अशी चर्चा सुरू आहे. कोकणचा चेहरा मोहरा बदलणारा हा महामार्ग केवळ रस्ता नाही, तर समृद्धीचा सेतू आहे.

पर्यावरणस्नेही डिझाइन, तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक सहभाग यामुळे कोकण नवा उदयासह पुढे जाईल. यासाठी कोकणवासीय नागरिक हे स्वप्न साकार होण्याची वाट पाहत असुन सन 2030 पर्यंत हा महामार्ग पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होण्याचा अंदाज असून, त्यानंतर कोकणचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. ‌‘कोकणचा कॅलिफोर्निया‌’ अशी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे

मार्गाचे वैशिष्ट्य आणि तांत्रिक वैभव

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतून वाहणारा हा 498 किलो मीटर लांबीचा सागरी महामार्ग मुंबई-गोवा महामार्गाला एक मजबूत पर्याय ठरेल. सध्या कोकणातील प्रवासातील अंतर 80 किलोमीटरने कमी होईल आणि दीड तास वेळ वाचेल, ज्यामुळे व्यापार, पर्यटन आणि दैनंदिन वाहतुकीला प्रचंड फायदा होईल. एकूण 10 हजार कोटी रुपयांचा हा मेगा प्रकल्प काही ठिकाणी चौपदरी आणि काही ठिकाणी दुपदरी रस्त्यांसह बांधला जात आहे.

‌‘अटल सेतू ते रेवस‌’ : सागरी महामार्गाचे भव्य प्रवेशद्वार !

मुंबईतील पासून करंजा मार्गे अलिबाग जवळील रेवस पर्यंत सुमारे 10 किलोमीटर लांबीचा भव्य पूल उभारला जात असून, हाच ‌‘रेवसरेड्डी सागरी महामार्गाचा‌’ प्रवेश बिंदू ठरणार आहे. हा पूल केवळ जोडणारा मार्ग नसून, मुंबई ते कोकण दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ करणारा महत्त्वाचा दुवा ठरेल. अटल सेतू सारख्या आधुनिक प्रकल्पाशी थेट जोडणी मिळाल्यामुळे या सागरी महामार्गाचे रणनीतिक आणि आर्थिक महत्त्व प्रचंड वाढले आहे. यामुळे भविष्यात मुंबईकोकण प्रवासाला नवे आयाम मिळतील आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटन, व्यापार व गुंतवणुकीसाठी कोकण अधिक आकर्षक पर्यटन उद्योग निर्मितीच केंद्र म्हणून उदयास येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT