अलिबाग : रेवस ते करंजा अशी प्रस्तावित असलेल्या रो रो जेट्टि चे काम मागील ६ वर्षांपासून हे काम ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे रखडले. यामुळे रेवस बंदरावरील ठेकेदाराची हकालपट्टी करण्यात आली आहे. जेट्टी चे उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने सुधारित मान्यता दिली आहे. त्यानुसार रेवस बंदरावर रो रो जेट्टीचा खर्च ३७ कोटी ४ लाख २ हजार ५४९ रुपयांवर पोहचला आहे.
सुरुवातीला जेट्टीचे उभारण्यासाठी कामासाठी २३ कोटी ३६ लाख ५१ हजार २१४ इतका अपेक्षित होता. ठेकेदाराच्या दिरंगाईमुळ खर्चात १३ कोटी ६७ लाख ५१ हजार ३३५ रुपयांची वाढ झाली आहे. असे असले तरी रेवस करंजा सागरी पूल झाल्यावर या रो रो सेवेला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत शंका आहे.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून रेवस व करंजा बंदरांवर रो रो सेवेसाठी शेट्टी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सागरमाला योजनांतर्गत ही कामे हाती घेण्यात आली. करंजा बंदरावरील जेट्टीचे काम पूर्ण झाले असून, ५ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी खर्चही झाला आहे. मात्र स्थानिकांकडून जोड रस्त्याच्या कामात विरोध झाल्याने हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
तसेच रेवस बंदरावर २०२० पासून रो रो अनुषंगाने कामे हाती घेण्यात आली. त्यासाठी २३ कोटी ३६ लाख ५२ हजार २१४ रुपयांचा निधी मंजूर आहे. ज्यापैकी १३ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मात्र ठेकेदारच्या अकार्यक्षमतेमुळे उर्वरित काम रखडले.
आता ठेकेदाराची हकालपट्टी करण्यात आली असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ३७ कोटी ४ लाख २ हजार ५४९ सुधारित मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार रेवस रो रो जेट्टीचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी तिजोरीवर १३ कोटी ६७ लाख ५१ हजार ३३५ अतिरिक्त भार पडणार आहे.
रो-रो सेवेला प्रतिसाद मिळणार का?
रेवस करंजा दरम्यान सागरी पूल मंजूर आहे. रेवस करंजा पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेवस ते करंजा दरम्यान अंतर वाहनाने दहा मिनिटांच्या आत पार करणे सहज शक्य होणार आहे. तर या मार्गावरील रो रो जहाजात वाहने पार्क करणे, त्यांनतर जलमार्गे प्रवास पूर्ण केल्यानंतर जहाजातून वाहन बाहेर काढणे यात वेळ जाणार आहे. यामुळे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रो रो सेवेला प्रतिसाद मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.