रेवदंडा: कोकण किनारपट्टीवरील पर्यटन हंगामाला वेग आल्याने रेवदंडा पंचक्रोशीतील मच्छीमार्केटमध्ये ताज्या माशांच्या किंमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. पर्यटकांकडून वाढलेली मागणी, मर्यादित आवक आणि व्यापाऱ्यांची वाढती खरेदी यामुळे पापलेट, सुरमई, रावस, कोळंबी यांसह अनेक प्रकारच्या माशांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.
रेवदंडा परिसर हा रायगडमधील महत्त्वाचा मासेमारी विभाग असून येथून मोठ्या प्रमाणावर ताजी मासळी विविध शहरांमध्ये पाठविली जाते. पर्यटनामुळे स्थानिक बाजारपेठेला आर्थिक चालना मिळत असली, तरी सर्वसामान्य कुटुंबांना मात्र रोजच्या जेवणातील मासे परवडेनासे झाले आहेत. पूर्वी सहज उपलब्ध होणारी मासळी आता वाढीव दरामुळे अनेकांच्या आवाक्याबाहेर गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
मच्छी विक्रेत्यांच्या मते, शनिवार-रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे सकाळीच चांगल्या प्रतीची मासळी विकली जाते आणि उरलेली मासळीही वाढीव दराने विकली जाते. परिणामी स्थानिक ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
स्थानिक नागरिकांनी पर्यटनासोबतच स्थानिक ग्राहकांचाही विचार करून दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने व संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याची मागणी केली आहे. अन्यथा कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आनंद स्थानिकांनाच घेणे कठीण होईल, अशी खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, बंदीचा कालावधी आणि पावसाळी वातावरणामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद आहे.