पेण : रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्यात परतीचा जोरदार पाऊस झाल्यानंतर या तालुक्यातील भातशेतीबाबत शेतकऱ्यांनी आपल्या संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पेण तालुक्यातील ही भातशेती पूर्व विभाग आणि खारेपाट विभाग अशा प्रकारे विभागली गेली असल्याने लावणी दरम्यान देखील वेगवेगळ्या कालावधीत ही भातशेती लागवड केली गेली आसल्याने कालच्या पडलेल्या परतीच्या पावसाच्या परिणामाच्या शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. याच परतीच्या पावसाने तालुक्यातील जोहे विभागातील बरीच शेती जमीनदोस्त झाली असल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
पेण तालुक्यात पूर्व भागात प्रामुख्याने खारेपाटातील भातशेतीपेक्षा लवकर लावण्या पूर्ण होत असल्याने आजच्या स्थितीला या भागातील भातशेती कापणी लायक झाली असल्याने हवामानाच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस हाच परतीचा पाऊस मुसळधार स्वरूपात पडल्यास पूर्व भागातील या शेतकऱ्यांच्या कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीला धोका निर्माण होऊ शकतो. तर दुसरीकडे खारेपाट भागतील बहुतांश शेतकऱ्यांनी पूर्व भागातील शेतकऱ्यांपेक्षा उशीराने भातशेती लावली असली तरी मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने उन्हामुळे भाताच्या पात्या करपून करपा रोग येण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता. मात्र काल समाधानकारक परतीचा पाऊस झाल्याने या खारेपाट भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
खारेपाट भागातील शेतकऱ्यांच्या लागवडी पूर्वीच या ठिकाणी आम्ही लवकरच भातशेती करत असतो. आत्ताच्या स्थितीला ही भातशेती कापणी लायक झाली असून कालच पडलेल्या पावसामुळे आता तयार झालेली भातशेती कापणी लांबणीवर गेली आहे. मात्र यापुढे असाच पाऊस पडला तर हा तयार भात गळून किंवा भातशेती कोलमडून आमचे नुकसान होऊ शकते.
- शरद जाधव, शेतकरी, सावळी, पूर्व विभाग