रायगड ः रायगड जिल्हयातील 59 जिल्हा परिषद गट आणि 118 पंचायत समिती गणांच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीची मुदत मंगळवारी संपली. दुपारी तीन नंतर जिल्हयातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांतील निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हयातील अनेक गट आणि गणांमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी 173 उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीची महाडमधील धामणेची जागा बिनविरोध झाली आहे. आता 117 जागांसाठी 374 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणातील उमेदवार निश्चित झाल्याने आता जिल्हयात खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जिलह्यात 59 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक होत आहे. 16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. रायगड जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत अपेक्षित असली तरी जागा वाटपा निश्चित न झाल्याने तर काही ठिकाणी इच्छुकांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने युती आणि आघाडीची समिकरण जुळवताना अडचणी निर्माण झाल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतलेली दिसली शिवाय यावेळी अपक्ष उमेदवारांची संध्या अधिक असून दिग्गज उमेदवारांपुढे त्यांनी आव्हान निर्माण केले असल्याचे दिसून येत आहे.
मंगळवारी (27 जानेवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुद्त होती. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी नंतर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांतील निवडणुक लढतींचे चित्र स्पष्ट झाले झाले आहे. जिल्हयात बहुतांश गट आणि गणांमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र आहे. काही ठिकाणी युती आणि आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या समोर उभे आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज माघारी बाबत सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाकडून उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकलेली नाही.
आता निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट झाल्याने सर्वच पक्ष आणि उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. बुधवारपासून राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून नियोजित पद्धतीने निवडणूक प्रचार सुरु होणार आहे. त्यामुळे या प्रचार सभा, बैठका आणि रॅल्यांमुळे जिल्हयातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या प्रचार सभा बैठकांमधून आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झाडेल्या दिसणार आहेत. येत्या पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी मतदान संपण्याच्या चोवीस तास आधी जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे आगामी सात दिवस निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे.