अलिबाग ः अतुल गुळवणी
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे.शनिवारी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.रायगडचे शिवतीर्थ कोण जिंकणार याची उत्सुकता रायगडच्या जनतेलाही लागली आहे.सत्तेच्या सारीपाटात कोणाची जित होते यावर जिल्ह्याचे राजकारण अवलंबून असणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या 59 आणि 15 पंचायत समित्यांच्या 118 जागांसाठी तब्बल तीन वर्षाच्या खंडानंतर निवडणुका होत आहेत. सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन अखंड शेकाप आणि राष्ट्रवादीने निर्विवादपणे सत्ता मिळविली होती.पाच वर्षे दोन्ही पक्षांनी सत्ता टिकवून ठेवली.त्यानंतर मात्र जि.प.वर आलेली प्रशासकीय राजवट,जिल्ह्यातील राजकीय पक्षांमध्ये झालेल्या फाटाफुटी आदी घटनांमुळे जिल्ह्याचे राजकीय समिकरणच बदलून गेलेले आहे.
त्यामुळे यावेळी होणाऱ्या निवडणुकीत कुणाची सत्ता येणार याबाबत ठोसपणे काहीच अंदाज बांधता येणार नाही.मात्र जे सत्तेवर येतील त्यांना परस्परांशी आघाडी,युती करुनच सत्ता मिळवावी लागणार हे नक्की.त्यामुळे आज हे राजकीय पक्ष परस्परांच्या विरोधात उभे ठाकले असले तरी 10 फेब्रुवारीनंतर सत्तेसाठी वेगळी समिकरणे निश्चित मांडली जातील.
रायगड जिल्ह्याचे राजकारण नेहमीच जिल्हा परिषदेच्या भोवती फिरत राहिलेले आहे. ज्या राजकीय पक्षाकडे जिल्हा परिषदेची सत्ता, त्याच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व राहिलेले आहे. त्यामुळे शिवतीर्थावर आपल्या पक्षाचा ध्वज फडकविण्यासाठी नेहमीच जिल्ह्यातील शेकाप, काँग्रेस यांच्यात चुरस दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर काँग्रेस सत्तेतून बाहेरच पडली आणि जिल्ह्याचे राजकारण शेकाप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांबरोबर फिरत राहिले.
जिल्हा परिषदेचा आतापर्यंतच राजकीय प्रवास पाहिला तर काँग्रेस, शेकाप अशी आलटून-पालटून सत्ता मिळत गेली. यावेळी त्यात भाजपने प्रवेश केला आहे.त्यामुळे यावेळी कोणत्या पक्षाकडे सत्ता जाते याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे.
घराण्यांचे वर्चस्व
रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात प्रभाकर पाटील आणि सुनील तटकरे परिवाराचे कायम वर्चस्व राहिलेले आहे. प्रभाकर पाटील यांच्यासह सुप्रिया पाटील, पंडित पाटील, आस्वाद पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. याशिवाय मीनाक्षी पाटील, जयंत पाटील, भावना पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्याचबरोबरच सुनील तटकरे यांच्यासह कन्या अदिती तटकरे, बंधू अनिल तटकरे, शुभदा तटकरे यांनीही जिल्हा परिषदेचे सदस्या म्हणून काही काळ काम पाहिले होते. भरत गोगावले. सुषमा गोगावले, मोहन पाटील, त्यांच्या स्नुषा निलिमा पाटील यांनीही जिल्हा परिषदेपासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.आता त्याच परिवारातील पुढची पिढी यावेळी निवडणुकीच्या रिंगणातउतरली आहे.
यावेळच्या निवडणुकीत तटकरे परिवारातील कुणीही निवडणुकीच्या रिंगणात नाहीत.मात्र,प्रभाकर पाटील यांच्या परिवारातील सुश्रृता पाटील,चित्रा पाटील, सवाई पाटील,पेणच्या खा.धैर्यशील पाटील यांच्या पत्नी ॲड.निलीमा पाटील या भाजपकडून भवितव्य अजमावित आहेत. मंत्री भरत गोगावले यांचे पूत्र विकास गोगावले हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.माजी मंत्री स्व.प्रभाकर मोरे यांचे सुपूत्रअमित मोरे यांनाही भाजपने रिंगणात उतरविलेले आहे.
राजकीय उदय झालेले नेते
या वास्तूतून अनेक नेते उदयास आले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने राज्याच्या राजकारणात चांगला ठसा उमटविला. जिल्हा परिषदेमधून राजकीय कारकीर्द सुरु करुन थेट राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविले, त्यामध्ये श्रीवर्धनचे रवींद्र राऊत, मोहन पाटील, मीनाक्षी पाटील, सुनील तटकरे, अदिती तटकरे पांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. याशिवाय जयंत पाटील, पंडित पाटील, सुरेश लाड, विवेक पाटील, मधुकर ठाकूर, तुकाराम सुर्वे, अनिल तटकरे, बाळाराम पाटील, माणिकराव जगताप, महेंद्र दळवी यांनी जिल्हा परिषदेपासून राजकीय कारकिर्द सुरु करीत आमदारकीपर्यंत मजल मारली. शेकापचे जयंत पाटील यांनी काहीकाळ विधानपरिषदेचे प्रभारी सभापतीपदही भूषविले होते. आता यामधील रवींद्र राऊत, मोहन पाटील आणि माणिकराव जगताप हे हयात नाहीत.