स्वप्नील पाटील
पेण: नुकत्याच शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर झाल्या असून या सुट्टीच्या काळात अनेक पालक मुलांना सुट्टी पडली असल्याने आपापल्या गावी जाणे पसंत करत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रायगड एसटी आगाराने जवळपास 41 जादा बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेसच्या माध्यमातून 15 एप्रिल ते 15 जून या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल 19 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे.
त्यामुळे रायगड जिल्ह्यातून सुट्टीच्या काळात आपापल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांनी आपला सुखकर आणि आरामदायी तसेच खिशाला परवडणारा असा प्रवास करण्यासाठी एसटीलाच पसंती द्यावी असे आवाहन रायगड विभाग नियंत्रक डॉ. सुहास चौरे यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यात अनेक शासकीय आणि निमशासकीय तसेच शिक्षक वर्गातील असे कर्मचारी आहेत की ते आपल्या कामानिमित्त आपल्या गावाहून या जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत. मात्र त्यांच्या या व्यस्त कामासोबतच मुलांच्या शैक्षणिक गोष्टीमुळे गावी जाणे त्यांना शक्य होत नाही.
परंतु आता मुलांना उन्हाळी सुट्टी पडली असल्याने सुट्टी निमित्त हे अनेक कर्मचारी किंवा सुट्टी असल्याने धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी म्हणून रायगड जिल्ह्याबाहेर जात असतात. याचा विचार करून एसटी महामंडळाने नंदुरबार, अहमदनगर, जामनेर, तुळजापूर, अक्कलकोट, शेगाव, ताम्हिणी, जेजुरी, मुंबई, नालासोपारा, बोरिवली आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर प्रवासासाठी जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे.
यामध्ये मध्यवर्ती कार्यालयातील मंजुरीनुसार 21 गाड्या, प्रादेशिक कार्यालयाच्या मंजुरीनुसार 3 जादा गाड्या आणि विभागीय कार्यालयाच्या मंजुरीनुसार 17 जादा गाड्या अशा एकूण 41 जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटी हे महत्वाचे प्रवासाचे साधन आहे.
त्यामुळे नागरिकांनी एसटी बसच्या प्रवासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. सुट्टयांच्या काळात शहरातील नागरिक आपल्या गावाकडे जात असतात. अशा वेळी एसटी हे सुरक्षित प्रवासाचे साधन ठरते. त्यामुळे एसटी महामंडळाने हंगामाच्या काळात नागरिकांसाठी अधिकाधिक सक्षम एसटी सेवा पुरविणे गरजेचे आहे.
फेऱ्या आणि किलोमीटर
महाड : 5 फेऱ्या : 2475.2
अलिबाग : 4 फेऱ्या : 1793.3
पेण : 5 फेऱ्या : 2097.6
श्रीवर्धन : 7 फेऱ्या : 3075.6
कर्जत : 4 फेऱ्या : 1736.2
एसटीचा प्रवास हा अतिशय सुखकर आणि आरामदायी आहे. त्याचप्रमाणे इतर खाजगी ट्रॅव्हल वाहनांच्या प्रवासापेक्षा एसटीचा प्रवास हा सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारा आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या काळात प्रवाशांनी जास्तीत जास्त एसटीचा प्रवास करावा.-डॉ. सुहास चौरे, विभाग नियंत्रक - रायगड