जयंत धुळप
रायगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाची अंमलबजावणी केवळ भाषणांपुरती मर्यादित न ठेवता, रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी ती प्रत्यक्ष कृतीत आणली आहे. आपल्या निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत जाण्यासाठी त्यांनी आता 'सायकल'चा वापर सुरू केला असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशातील वाढता इंधनाचा वापर आणि पर्यावरण रक्षणासाठी पंतप्रधानांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. हे आवाहन शिरसावंद्य मानून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्वतःपासून बदलाला सुरुवात केली आहे. पोलीस दलातील सर्वोच्च पदावर असतानाही, कोणताही बडेजाव न ठेवता त्या दररोज सायकलने कार्यालयात ये-जा करत आहेत.
प्रत्यक्ष कृतीतून दिला आदर्श
पोलीस अधीक्षकांचे कार्यालय आणि निवासस्थान यामधील प्रवासासाठी शासकीय वाहनांचा वापर टाळून त्यांनी पर्यावरणाप्रती आपली सजगता दाखवून दिली आहे. एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने अशा प्रकारे सायकल चालवत कामावर जाणे, हा केवळ इंधन बचतीचा संदेश नसून आरोग्यासाठीही उत्तम व्यायाम असल्याचा वस्तूपाठ त्यांनी समाजासमोर घालून दिला आहे.
जिल्ह्यात उमटले पडसाद
जिल्हा पोलीस प्रमुखांच्या या निर्णयामुळे पोलीस दलासह सामान्य नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश गेला आहे. सोशल मीडिया आणि प्रशासकीय वर्तुळात आंचल दलाल यांच्या या साधेपणाचे आणि पर्यावरणपूरक भूमिकेचे स्वागत होत आहे. त्यांच्या या कृतीचा आदर्श घेऊन अन्य अधिकारी व कर्मचारीही आठवड्यातून किमान एक दिवस सायकलचा वापर करण्याबाबत विचार करत आहेत. प्रशासकीय प्रमुख जेव्हा स्वतः नियमांचे पालन करून आदर्श उभा करतात, तेव्हा त्याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होते, हेच आंचल दलाल यांच्या या 'सायकल प्रवासा'तून दिसून येत आहे.