प्रदूषणामुळे स्थानिक गावांमध्ये पाणी आणि आरोग्य संकट निर्माण झाले आहे. Pudhari News Network
रायगड

Raigad | वाढत्या प्रदूषणाने श्रीवर्धनकरांचे आरोग्य संकटात

बेकायदा उत्खननाने निसर्गाचे संतुलन बिघडले, प्रशासनाकडून उत्खननाकडे होतेय दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

श्रीवर्धन : भारत चोगले

श्रीवर्धन तालुक्यातील वाहतूक व्यवस्था आणि बॉक्साइट मायनिंग प्रकल्पामुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे अपघातांची संख्या झपाट्याने वाढली आहे, तर दुसरीकडे प्रदूषणामुळे स्थानिक गावांमध्ये पाणी आणि आरोग्य संकट निर्माण झाले आहे. या समस्यांवर राज्य सरकार आणि संबंधित अधिकार्‍यांनी त्वरित आणि ठोस कारवाई करणे आवश्यक आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर ओव्हरलोड बॉक्साइट वाहतुकीमुळे अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे. कांळीजे, कुडगाव, मारल, मेघरा, बापवन, आणि जसवलीसारख्या ठिकाणी अत्यंत वेगाने धावणारी बॉक्साईट डंपर्स आणि ट्रॅक्टर वाहने नेहमीच धोक्याचा इशारा देत आहेत. मागील काही वर्षांत या वाहनांच्या अपघातांमुळे एक-दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत.

नागरिकांत सरकारच्या कार्यप्रणालीवर तीव्र असंतोष आहे, कारण आरटीओ विभागाच्या कारवाईची गती अत्यंत मंद आहे आणि ओव्हरलोड वाहने सध्या मनमानीपणे धावत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारीनुसार, पोलीस, आरटीओ आणि महसूल प्रशासनाच्या कार्यवाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ओव्हरलोड वाहतुकीला शासनाकडून कोणतीही कडक दंडात्मक कारवाई होत नसल्यामुळे, नागरिकांचा विश्वास राज्य प्रशासनावर कमी होत आहे.

तसेच, श्रीवर्धन तालुक्यातील बॉक्साइट मायनिंग प्रकल्पामुळे स्थानिकांमध्ये प्रदूषणाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. प्रदूषणामुळे पाणी स्रोत दूषित होत आहेत, फळपिके नष्ट होत आहेत आणि स्थानिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्य आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी त्वरित या प्रकल्पाच्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रमोद घोसाळकर यांच्या निवेदनानुसार, हा प्रकल्प तत्काळ बंद करावा, अन्यथा तो स्थानिकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. आता, राज्य सरकारला आणि संबंधित विभागांना एक ठोस, कडक, आणि त्वरित कारवाई घेणे आवश्यक आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत ओव्हरलोड वाहतुकीवर कठोर दंड आणि तपासणी लागू करावी. बॉक्साईट मायनिंग प्रकल्पाच्या विरोधात त्वरित निर्णय घेतला जावा. श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या जीवाचे आणि पर्यावरणाचे संरक्षण मिळावे, हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन, राज्य शासन आणि संबंधित मंत्री, भरतशेठ गोगावले यांना या गंभीर समस्यांवर त्वरित दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

प्रशासनाचा गोंधळ

श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना वाटत आहे की, या समस्या सोडविण्याऐवजी काही राजकीय प्रभावी लोकांच्या वरदहस्तामुळे प्रशासन या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. ओव्हरलोड वाहतुकीवरील कारवाई आणि बॉक्साईट मायनिंग प्रकल्पाबाबत शासनाचा गोंधळ स्पष्टपणे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT