रमेश कांबळे
अलिबाग: अलिबाग तालुक्यातील चरी मंडळ अधिकारी यांना पोयनाड पोलिसांनी केलेल्या अटकेविरोधात रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अटकेची कारवाई बेकायदा असल्याचा आरोप करीत महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारी (२७ जुलै) लेखणी बंद आंदोलन केले. या लेखणीबंद आंदोलनामुळे तलाठी, तहसीलदार ते जिल्ह्याधिकारी कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला. जिल्ह्यातील ठिकठिकाणी निदर्शने झाली.
शहापूर औद्योगिक क्षेत्रासाठी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महसूल विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांनी फेरफार नोंदींमधून शाह यांचे नाव वगळले किंवा रद्द केले. परिणामी, वास्तविक खरेदीदाराचा अधिकार नाकारत मूळ खातेदारांच्या नावावर भूसंपादनाचा मोबदला मंजूर करण्यात आला आहे.
याच प्रक्रियेत ४३ लाख १५ हजार ३८ रुपयांचा मोबदला मूळ खातेदार आणि मृत व्यक्तीच्या नावावर वितरित करण्यात आल्याचा आरोप शहा यांनी तक्रारीत केला आहे. तसेच, मृत सुमन पाटील यांचे नाव सातबारा उता-यावर कायम ठेवणे, फेरफार नोंदींमध्ये दिशाभूल करणारे बदल करणे आणि सरकारी अभिलेखांमध्ये छेडछाड करून शासनासह तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप केला आहे.
शहा यांच्या तक्रारीवरुन पोयनाड पोलिस ठाण्यात चरी मंडळ अधिकारी रविदास सदुसिंग जाधव, तलाठी सतिश भानुदास दवले, मूळ जमीनधारक रितेश किसन पाटील, रिना किसन पाटील उर्फ रिना साईराज येलमकर आणि व्यवहारातील मध्यस्थ कुमार नारायण बैकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोपनाड पोलिसांनी मंडळ अधिकारी जाधव यांना अटक केली आहे. मात्र, मंडळ अधिका-यांवरील अटकेची कारवाई कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता करण्यात आल्याचा आरोप महसूल अधिकारी व कर्मचा-यांनी केला आहे. या प्रकरणात न्याय मिळावा, अटकेची कारवाई मागे घ्यावी आणि संबंधित अधिका-यांवरील कारवाईचा फेरविचार करावा, या मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन झाले.