महाड तालुक्यातील राजिप प्राथमिक आरोग्य केंद्र चिंभावे दवाखान्याच्या इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टरचा काही भाग गुरुवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान कोसळला असून तेथील सफाई कामगार सुदैवाने वाचले आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती उपलब्ध झाली असून सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
खाडीपट्टयाच्या ग्रामीण भागामध्ये चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्र येत असून सन 2007 साली सदर दवाखान्याच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. मात्र तत्पूर्वी ही इमारत धुळखात पडली होती. इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर पडण्याच्या घटना अनेकवेळा समोर आल्या आहेत. तर सदर इमारत पावसाच्या पाण्याने ठिकठिकाणी गळत देखील होती. गतवर्षीच इमारतीला पत्र्याच्या शेडचे छप्पर देण्यात आल्यामुळे इमारतीची गळती थांबली असली, तरी इमारतीच्या बांधकामाच्या छताचे प्लास्टर पडण्याच्या घटना रुग्ण तपासताना देखील घडल्या असल्याच्या समोर आल्या आहेत. सदर इमारत दोन मजली असून वरील मजला पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. तेथील इलेक्ट्रीकसिटीची लाईन बाहेर पडून लोंबकळत आहे, तर खांबामधून स्टील देखील बाहेर पडले आहे.
गुरुवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान बाहय रुग्ण तपासणी संपल्यानंतर तेथील सफाई कामगार दयानंद दळवी सफाई करण्यासाठी रुग्ण तसण्याच्या डॉक्टर यांच्या केबिनमध्ये जाताना ते प्रवेशद्वारावर उभे असताक्षणी वरील स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग कोसळू लागला हे पाहताच सफाई कामगार दळवी त्याचठिकाणी थांबले म्हणून सुदैवाने ते बालंबाल वाचले. साधारण अडीच ते तीन फुटाचा प्लास्टरचा काही भाग कोसळला असून सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
घटना घडल्यानंतर तात्काळ चिंभावे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच विक्रम मालप यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. राजिप बांधकाम विभागाला कळवून राजिप कर्मचार्यांनी शुक्रवारी सकाळी येऊन तेथील पडलेल्या स्लॅबच्या प्लास्टरचा कचरा गोळा करून सदर रुग्ण तपासणी केबिन बंद करून रुग्ण तपासणीसाठी वेगळी केबिन देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
सदर इमारत धोकादायक होत चालली असल्याचे लक्षात घेता या इमारतीमध्ये 2 वैद्यकीय अधिकारी, 3 सुपरवायझर, 1 आरोग्य सेविका, 1 लॅब टेक्निशियन, 1 महालॅब कर्मचारी, 1 फार्मासिस, 1 क्लार्क, 1 डाटा एन्ट्री कर्मचारी, 1 सफाई कामगार तसेच 1 अर्धवेळ स्त्री परिचर या कर्मचार्यांना दवाखान्याचे 35 गावांचे कार्यक्षेत्र आणि 19 हजार 534 लोकसंख्या असलेल्या कार्यक्षेत्रातून दररोज येणार्या 40 ते 50 बाह्य रुग्णांना आरोग्य सेवा देताना अशा प्रकारच्या घटना घडल्यास मोठा धोका पोहचू शकतो.
इमारतीचे उद्घाटन होऊन केवळ 17 वर्षे उलटली असताना अशा घटना घडणे हे योग्य नाही. इमारतीची डागडुजी देखील करण्यात आली असून ठेकेदाराने चांगल्या प्रतीचे काम केलेले नाही. सदर इमारत धोकादायक आहे. तरी रायगड जिल्हा परिषदेने या घटनेकडे गांभीर्याने पाहून मोठी दुर्घटना घडण्याअगोदर कार्यवाही करावी.विक्रम मालप, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत चिंभावे