अलिबाग : पुरेसा व योग्य पोषण आहार न मिळाल्यामुळे आजारपण व अशक्तपणा बालकांमध्ये उद्भवतो तेच कुपोषित बालकाचे लक्षण आहे. रायगड जिल्ह्यात मार्च २०२६ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या ९४ हजार ६१३ बालकांपैकी ४१ तीव्र कुपोषित तर ३३० सौम्य कुपोषित बालके आढळून आली आहेत. अंगणवाड्या आणि सरकारी रुग्णालय पुरवला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असतो. त्यामुळे कुपोषण वाढत आहे. कुपोषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात. कुपोषण कमी झाले असले तरी तरी ते आटोक्यात आलेले नाही.
जिल्हा महिला व बालकल्याण विभाग तसेच आरोग्य विभागाकडून सहा वर्षापर्यंतच्या बालकांची तपासणी करण्यात येते. या तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील कुपोषणाची आकडेवारी चिंताजनक आहे. तपासणी करण्यात आलेल्या ९४ हजार ६१३ बालकांपैकी ३७१ बालके कुपोषित आढळून आली आहेत. यामधील ४१ बालके तीव्र कुपोेषित तर ३३० बालके सौम्य कुपोषित आहेत.
कुपोषणावर मात करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा खर्चही करण्यात येतो. अंगणवाडी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये पोषण आहार पुरविण्यात येतो. तसेच सरकारी रुग्णालये व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी ठिकठीकाणी बाल संगोपन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मात्र असे असूनही जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येते.
आदिवासी विभागाकडून पोषण आहार योजनेसाठी केल्या जाणार्या आर्थिक तरतुदीत झालेली घट, कुपोषण निर्मितीसाठी गाव पातळी, तालुका पातळीवरील समित्याच अस्तित्वात नसणे, शासनाकडून वाटप करण्यात येणारी पाकीट खाण्यास मुलांची उदासिनता हि देखील कुपोषण समस्येमागील काही महत्वाची कारणे असल्याची बाब समोर आली आहे.
जिल्ह्यातील बालके दृष्टीक्षेपात
* तपासणी केलेली बालके - ९४ हजार ६१३
* तीव्र कुपोषित बालके - ४१
* सौम्य कुपोषित बालके - ३३०
रायगड जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात महिला व बाल विभागाला यश आले आहे तीव्र कुपोषित बालके बाबत अधिक काळजी घेतली जाते. अंगणवाडी सेविका गृहभेटीही देत असतात. कुपोषित बालकांना अंगणवाडी सेविकांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवले जाते.तेथे काळजी घेतली जाते. तसेच अंगणवाड्यांमध्ये गरम ताजा आहार आणि घरपोच आहार या दोन गोष्टी आम्ही बालकांना देत असतो.निर्मला कुचिक (महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद रायगड)