पावसाळ्यात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कलोते ते खालापूर दरम्यान झालेल्या अपघातांची आकडेवारी  Pudhari News Network
रायगड

रायगड : राष्ट्रीय महामार्गाकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष

पावसाळ्यापूर्वी उपाययोजना न केल्यास प्रवाशांच्या जीवावर बेतणार

पुढारी वृत्तसेवा

खालापूर (रायगड) : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभाग पनवेल यांनी धोकादायक टप्पा म्हणून सूचनाफलक बसवलेला कलोते नजीकच्या धोकादायक वळणाकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि आय आर बी ने देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दरवर्षी मुसळधार पाऊस पडला की या ठिकाणी चार फुटापेक्षा अधिक पाणी साचत असून गेल्या वर्षी या ठिकाणी प्रवाशांनी भरलेली बस पाण्यात अडकून बसल्यानंतर आपत्कालीन पथकाने प्रवाशांची सुटका केली होती.

पावसाळ्यात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कलोते ते खालापूर दरम्यान साचलेल्या पाण्यात अडकून बसलेली वाहन.

अनेकांचे जीव वाचले होते. जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाची देखभाल आणि दुरुस्तीचा ठेका आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चरकडे आहे. खालापूर हद्दीत महामार्गावर अनेक ठिकाणी खासगी जागा मालकांनी जागा विकसित करताना रस्त्याची बाजू पट्टी तसेच पावसाळी नाले यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. याचाच परिणाम दरवर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी महामार्गावर पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पनवेलहून खालापूरच्या दिशेने येताना कलोते गाव सोडल्यानंतर वळणदार रस्ता आहे.

या ठिकाणी रस्त्यालगत पावसाचे पाणी वाहून नेण्याचे गटार काही ठिकाणी बुजवण्यात आल्याने पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्याचा परिणाम सातत्याने तीन वर्षापासून मुसळधार पाऊस पडला की दिसून येतो. बस, ट्रक यासारखी मोठी वाहन देखील या ठिकाणी साचलेल्या पाण्यात फसल्याने बंद पडल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

सध्या या मार्गावर काही ठिकाणी आयआरबी कडून गटार सफाईची काम सुरू आहेत. परंतु पाणी साचत असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपायोजना हाती घेण्यात न आल्याने पावसाळ्यात पुन्हा हा भाग प्रवासासाठी धोकादायक होणार आहे. पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी उपाययोजना करावी यासाठी रस्ता सुरक्षा अभियान दिलासा फाउंडेशन आय आर बी आणि खालापूर पोलीस ठाणे यांना लेखी निवेदन देणार आहे.

दरवर्षी मुसळधार पाऊस पडला की या ठिकाणी चार ते पाच फूट पाणी साचते. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी साचलेला पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांच्या जीवावर बेतले होते. पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबीने प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे देखील लक्ष पुरवणे गरजेचे आहे.
भाग्यश्री शिंदे, रस्ता सुरक्षा अभियान उपक्रम प्रमुख दिलासा फाऊंडेशन

पावसाळ्यात धोकादायक प्रादेशिक परिवहन विभाग पनवेल यांनी या ठिकाणी वळणावर धोकादायक भाग म्हणून फलक लावला असून तीन वर्षातील अपघाताची आकडेवारी दिली आहे. 19 अपघातात 7 मृत्युमुखी आणि 15 गंभीर जखमी झाल्याचा फलकावर उल्लेख आहे. अपघातग्रस्त असा शिक्का बसलेला हा भाग पावसाळ्यात देखील तेवढा धोकादायक आहे.

आयआरबीकडून जुन्या कामाची दुरूस्ती केली जाते. पाण्याचा निचरा होण्यासाठी नव्याने उपाययोजना करावी लागणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाना कळविण्यात येईल.
अनिल धायगुडे, अभियंता आयआरबी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT