अलिबाग : रायगड जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी जोरदार पावसाने झोडपले. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जनजिवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून, पाऊसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, सुमारे ५३.६८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शनिवारी रायगड जिल्ह्यात १११.२६ मिलीमीटरच्या सरासरीने १ हजार ७८०.२ मिलीमीटर पाऊस पडला. दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा ईशारा प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला असल्याने, जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.
रायगड जिल्ह्यात पडणार्या जोरदार पावसामुळे सलग चौथ्या दिवशी जनजिवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात ठिकठीकाणी सखल भागांमध्ये पाणी साचत आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये पाणी साचत आहे. रस्त्यांवर झाडे तसेच झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना रस्त्यांवर वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. ठिकठीकाणी वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पावसाच्या सरींसोबत वीजही गुल होत आहे.
मागील चार पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. कुंडलिका, आंबा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. मात्र काही काळावधीनंतर पाऊस थोडीशी विश्रांती घेत असल्याने नद्यांमधील पाणीसाठ्याचा विसर्ग होत आहे. जिल्हा प्रशासन नद्यांच्या पाणीपातळीकडे लक्ष ठेऊन असून, दर चार तासांनी नद्यांच्या पाणीसाठ्याची माहिती घेण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील कोलाड लघु पाठबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या २८ धरणांची पाणी पातळी वाढू लागली आहे. या धरणांमध्ये सुमारे ५३.६८ टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे. सुतारवाडी, कोंडगाव, उन्हेरे, पाभरे, संदेरी, कोथुर्डे, खैरे ही सात धरणे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागली आहेत. तर उर्वरित धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
रायगड जिल्ह्याला सलग चार दिवस पावसाने झोडपूण काढले आहे. मात्र पावसाचा जोर कमी व्हायचे नाव घेत नसून रविवारी व सोमवारी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा ईशारा प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. जिल्हा प्रशासनानेही दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना सावधानतेचा ईशारा दिला आहे. तसेच शोध व बचाव पथक, बचाव साहित्य, रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत. संबंधित विभागांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. वरिष्ठ अधिकार्यांना जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय कार्यालय सोडण्यास बंदि घालण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात पडलेला पाऊस
रायगड जिल्ह्यात शनिवारी १११.२६ मिलिमीटरच्या सरासरीने १ हजार ७८०.२ मिलीमीटर पाऊस पडला. अलिबाग ७८, मुरुड ११३, पेण ११०, पनवेल ७८.२, उरण ८२, कर्जत ६८, खालापूर ९२, रोहा ७९, सुधागड ११६, माणगाव १०२, तळा १३३, महाड १६२, पोलादपूर २२२ म्हसळा १७६, श्रीवर्धन ७७ मिलीमीटर पाऊस पडला.