खोपोली ः खालापूर तालुक्यातील गेल्या काही वर्षापासून गोळेवाडी मार्गे खानाव, भोकरपाडा, नारंगी गोरठण अशा अनेक गाव आणि वाड्याना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची चाळण झाल्याने जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतराच्या मार्गावरून प्रवास करणे सर्वाना जिकरीचे बनले आहे.
हा मार्ग वर्दळीचा असून रात्र - दिवस परिसरातील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, स्कूल बस व अन्य वाहनांची वाहतूक सुरू असल्याने खड्डेमय मार्गावरून प्रवास करणे मोठे कसरतीचे बनले असून सर्व प्रवासी व वाहन चालक या खड्डेमय रस्त्यामुळे हैराण झाले आहेत. तर या खड्डेमय रस्त्याचे संबंधित प्रशासनाने गांभीर्य घेत या रस्त्याची दुरूस्ती करीत लवकरात लवकर मार्ग खड्डेमुक्त करा अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
तालुक्यातील गोळेवाडी, खानाव मार्गे भोकरपाडा, नारंगी गोरठण अशा अनेक गाव आणि वाड्याना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या मार्गावरुन अनेक शाळकरी विद्यार्थी व नागरिक, चाकरमानी दररोज प्रवास करीत असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ पाहायला मिळत असल्यामुळे या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन मोटार सायकल चालकाच्या गाड्या या रस्त्यावरून घसरून वाहन चालकांना दुखापत होत आहे, त्याच बरोबर चार चाकी वाहन चालकांना खड्यातून पुढील मार्ग शोधणे कठीण बनत असल्याने सर्व जण खड्डेमय रस्त्याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.