खालापूर : सावरोली खारपाडा राज्य मार्गावर नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघाजणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
खरसुंडी आदिवासीवाडीत राहणारा अशोक पारधी हा दुचाकीवरुन सावरोलीकडे निघाला होता. रात्रीच्या सुमारास तो गावानजीक असलेल्या मार्गाने सुसाटपणे जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि सुसाट वेगात असलेली दुचाकी खरसुंडी वाडीत राहणार्या दिनेश वाघमारे, सुरेखा पवार आणि वर्षा कातकरी यांना धडकून विजेच्या खांबावर आदळली. ही धडक इतकी जोरात होती की त्यात अशोक पारधी(वय 24,वरसई, पेण)याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला
अपघातात गंभीर जखमी दिनेश वाघमारे, सुरेखा पवार यांना तातडीने उपचार करता रुग्णवाहिकेतून एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असताना दिनेशचा मृत्यू झाला. जखमी सुरेखा आणि वर्षावर उपचार सुरू आहे. खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित सावंत करीत आहेत.
आजच्या तरुणाईकडे महागड्या बाईक आहेत. त्यात वेगाची नशा पण नियमांची माहिती नसणे यामुळे अपघात वाढले आहेत. आठवड्यात रायगड जिल्ह्यात दुचाकी अपघातात पाचपेक्षा अधिक बळी गेले आहेत. ही चिंतेची बाब असून तरुणाईचे प्रबोधन आवश्यक आहे.-भाग्यश्री शिंदे, रस्ता सुरक्षा अभियान प्रमुख दिलासा फाऊंडेशन