अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ७३ उद्योगांबरोबर तब्बल ५४८० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, यामुळे जिल्ह्यात ४ हजार ४१३ नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. मोठ्या प्रकल्पांसोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही आवश्यक सर्व सोयी-सुविधा देऊन भक्कम पाठबळ दिले जाईल, अशी माहिती रोहयो मंत्री तथा रायगडचे नवनिर्वाचीत पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली.
राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला गती देणे, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी पालकमंत्री गोगावले बोलत होते.
यावेळी आ. महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत कळंबे, कोकण विभागाचे सह आयुक्त संदीप पाटील, पनवेल औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विजय लोखंडे, तळोजा इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष सतिश शेट्टी, जवाहर सहकारी औद्योगिक वसाहत कामोठेचे चेअरमन स्वप्नील गुप्ते, ॲडिशनल पाताळगंगा इंडस्ट्रियल असोसिएशनचे चेअरमन परमजीत सिंग, तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त जी. एस. हरळय्या यांच्यासह विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्योजकांच्या अडचणी तत्परतेने सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उद्योग सेतू’ उपक्रमाची माहिती देताना गोगावले म्हणाले की, दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत ऑनलाइन व्हीसीच्या माध्यमातून उद्योजकांच्या तक्रारींचे निवारण केले जाते. या बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळ व कामगार विभागासह सर्व प्रमुख यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी थेट उपस्थित राहून जागेवरच प्रश्न मार्गी लावतात, असेही ते म्हणाले.