रायगडमधील जलजीवन मिशनची 617 कामे पूर्ण File Photo
रायगड

Raigad | रायगडमधील जलजीवन मिशनची 617 कामे पूर्ण

जिल्ह्यात एकूण 1496 कामे; 43 योजनांची कामे अंतिम टप्प्यात; ग्रामीण भागातील महिलांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1 हजार 496 पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत. या योजनांपैकी 617 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर 43 योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन, घराघरात नळ कनेक्शन दिल्याने ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला आहे.

जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.

या योजनेच्या माध्यमातून 15 तालुक्यांमध्ये 1 हजार 496 योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील 617 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून, योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.

रायगड जिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाईची समस्या असते. जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गाव-वाड्यांमध्ये अलिबाग तालुक्यातील साधारणत: 52 गावे, 37 वाड्या, उरण तालुक्यातील 8 वाड्या, पनवेल तालुक्यातील 32 गावे, 35 वाड्या, कर्जत तालुक्यातील 27 गावे, 77 वाड्या, खालापूर तालुक्यातील 20 गावे, 54 वाड्या, पेण तालुक्यातील 54 गावे, 189 वाड्या, सुधागड तालुक्यातील 7 गावे, 49 वाड्या, रोहा तालुक्यातील 39 गावे, 44 वाड्या, माणगाव तालुक्यातील 23 गावे, 33 वाड्या, महाड तालुक्यातील 33 गावे, 136 वाड्या, पोलादपूर तालुक्यातील 38 गावे, 89 वाड्या, म्हसळा तालुक्यातील 13 गावे, 16 वाड्या, श्रीवर्धन तालुक्यातील 31 गावे, 97 वाड्या, मुरूड तालुक्यातील 10 गावे, 12 वाड्या आणि तळा तालुक्यातील 36 गावे, 37 वाड्या असतात. यात कमी जास्त गाव-वाड्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

जल जीवन मिशनअंतर्गत 617 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पुढील महिनाभरात 43 योजनांची कामे पूर्ण होतील. सुरू असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ठेकेदार अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत.
डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT