Poladpur Drought Demand Pudhari
रायगड

Poladpur Drought Demand: पाऊस लांबल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांची मागणी

गोवेलेत भात रोपे वाचवण्यासाठी धडपड; राबांना पाईपने पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: पोलादपूर तालुक्यात यंदाच्या मान्सूनने अपेक्षित हजेरी न लावल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून महिना सरत असतानाही समाधान-पाऊस न झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची भात पिके करपण्याच्या मार्गावर आली आहेत.

शेतीच्या कामासाठी कर्ज काढून, मोठा खर्च करून आणि पावसाच्या आशेवर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता मावळू लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

तालुक्यातील गोवेले गावातील शेतकरी भगवान अहिरे यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही २१ मेच्या सुमारास भात पेरणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक लक्षात घेऊन शेतकरी मे महिन्याच्या अखेरीस पेरणीचे नियोजन करत असतात. यंदाही मान्सून वेळेत दाखल होईल, या विश्वासाने त्यांनी भात पेरणी पूर्ण केली.

मात्र पावसाने दडी मारल्याने आणि त्यानंतर वाढलेल्या तीव्र उष्णतेमुळे भात रोपे सुकू लागली आहेत. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून भगवान अहिरे सध्या पाईपद्वारे पाणी देऊन भात रोपे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु शेतीचे क्षेत्र मोठे असल्याने आणि पाण्याचे स्रोत मर्यादित असल्याने संपूर्ण शेतीला पाणी देणे शक्य होत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये याच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी भाताची रोपे पूर्णपणे पिवळी पडू लागली असून काही ठिकाणी रोपांची वाढ खुंटली आहे. शेतीमध्ये ओलावा नसल्याने जमीन कोरडी पडत आहे. परिणामी पिकांच्या वाढीस आवश्यक असलेली परिस्थिती निर्माण होत नसल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भात हे कोकणातील आणि विशेषतः पोलादपूर तालुक्यातील प्रमुख पीक मानले जाते. घरखर्चाची आणि कर्जफेडीची सर्व गणिते भात पिकाच्या उत्पन्नावरच अवलंबून असतात. मात्र यंदाच्या अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. दिवसभर कडक ऊन आणि उष्णतेची लाट यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.

हवामानातील बदलांचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून त्यांच्या कष्टावर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत दिव-सेंदिवस वाढ होत असताना शेतकऱ्यांच्या मनातील चिंता देखील वाढत आहे. अनेक शेतकरी दररोज आपल्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करत आहेत आणि आकाशाकडे आशेने नजर लावून बसले आहेत.

यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, पीक विम्याचा लाभत्वरित मिळावा तसेच आवश्यक असल्यास पोलादपूर तालुक्यासह प्रभावित भागात सुका दुष्काळ जाहीर करून विशेष मदत पॅकेज द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT