नेरळ : नेरळमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणीबाणीने भीषण रूप धारण केले आहे. कडाक्याच्या उन्हात नागरिकांना पाण्याचा एक थेंबही मिळत नसल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे. नळांना पाणीच येत नसल्यामुळे घराघरात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून ग्रामस्थ अक्षरशः टाहो फोडत आहेत.
या संकटामागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे. नेरळ ग्रामपंचायतीने महावितरणचे सुमारे 80 लाख रुपयांचे वीज बिल थकविल्यामुळे दि. 16 मार्च रोजी महावितरण कंपनीने पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठाच खंडित केला. त्यामुळे संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
एकीकडे पाण्यासाठी नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र जबाबदारी झटकताना दिसत आहे. “नागरिकांनी पाणी बिल भरले नाही, त्यामुळे वसुली झाली नाही,” असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र ग्रामस्थांनी यावर संताप व्यक्त करत “आम्ही बिल भरतो, मग आम्हालाच पाण्यापासून वंचित का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे 12 महिने वाहणारी उल्हास नदी जवळ असतानाही नेरळकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नदी उशाला आणि घसा कोरडा अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिक माधवराव गायकवाड यांनी ग्रामसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यावर ग्रामपंचायतीने अर्धी थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. पण संताप शमलेला नाही! नेरळमधील हेटकरआळी येथील महिला मंडळाने बुधवार पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर थेट मोर्चा काढला जाईल,असा इशारा दिला आहे.
आर्थिकदृष्ट्या सक्षम समजली जाणारी नेरळ ग्रामपंचायत आज अक्षरशः कोलमडल्याचे चित्र समोर आले असून, नागरिक मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका सहन करत आहेत.
थकीत पाणी विजजोडणी बिलापैकी चार लाख रूपये हे भरण्यात आले असुन, आज संध्याकाळ पर्यंत विजजोडणी ही पूर्वत्व होईल, मात्र विजजोडणी संदभातील पुढील थकित विजबिल भरणा करण्यासाठी नागरिकांनी आपली थकीत घरपट्टी व पाणी पट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.सुजित धनगर, प्रशासक, नेरळ ग्रामपंचायत