पनवेल : नवी मुंबई विमानतळ 25 डिसेंबरपासून प्रवाशांसाठी सुरू झालं होतं. त्यावेळी हे विमानतळ फक्त 12 तासांसाठी कार्यन्वित होतं, परंतु 1 फेब्रुवारीपासून 24 तास सुरू ठेवण्यातआले आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत सुरू असलेलं विमानतळवर आता 24 तास विमानसेवा सुरू राहतील. यामुळे विमानतळावरील उड्डाणांची संख्या लवकरच वाढणार आहे.
सध्या केवळ दोनच विमानांची भर घालण्यात आली आहे, परंतु येत्या काही दिवसांत आणि आठवड्यांत विमान कंपन्या नवी मुंबईतील आपले वेळापत्रक वाढवतील अशी अपेक्षा आहे, असे सूत्रांनी सांगितले. मार्च महिन्याच्या अखेरीस, जेव्हा विमान कंपन्यांचे उन्हाळी वेळापत्रक सुरू होईल, तेव्हा विमानसेवेच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
12 जानेवारी रोजी, नवी मुंबई विमानतळाने एक महत्त्वाचा परिचालन टप्पा पार केला होता. विमानतळ सुरू झाल्यापासून फक्त 19 दिवसांत तब्बल 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. युरोप आणि अमेरिकेत, प्रमुख विमानतळ वगळता, बहुतेक विमानतळे ध्वनी प्रदूषण मर्यादित करण्याच्या रात्रीच्या संचारबंदीच्या नियमांनुसार, सहसा रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत बंद होतात. ही विमानतळे बंद झाल्यावर अडकलेल्या प्रवाशांना टर्मिनल सोडावे लागते. परंतु, भारतातील प्रमुख विमानतळे 24 तास खुली राहतात. यामुळे विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना रात्रभर राहण्यासाठी एक सुरक्षित जागा मिळते.
अद्याप रात्री उशिराच्या कोणत्याही विमानांचं वेळापत्रक निश्चित केलंलं नाही पण लवकरच मध्यरात्रीच्या सेवा ही सुरू करण्यात येतील. सध्या नवी मुंबई विमानतळावरील शेवटचं विमान रात्री 9.50 ला उड्डाण घेणार असून, पहिलं उड्डाण सकाळी 7.10 वाजता होणार आहे. विमान वाहतूक उद्योगातील सूत्रांनी सांगितले की, उन्हाळी वेळापत्रक सुरू झाल्यावर आणखी विमानांची भर घातली जाईल. सध्या प्रतितास 10 विमानांची हालचाल असलेली संख्या येत्या एप्रिल महिन्यापर्यंत दुप्पट म्हणजेच, 20 होण्याची शक्यता आहे.