रोहे : उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी आणि प्रवासाची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते सुलतानपूर आणि वाराणसी दरम्यान ३४ अतिरिक्त उन्हाळी विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई आणि सुलतानपूर दरम्यान धावणाऱ्या या विशेष गाडीमुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
गाडी क्र. ०४२११: २१ मे २०२६ ते १६ जुलै २०२६ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी १४:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २३:०० वाजता सुलतानपूर येथे पोहोचेल.
गाडी क्र. ०४२१२: २० मे २०२६ ते १५ जुलै २०२६ पर्यंत दर बुधवारी सुलतानपूर येथून पहाटे ०४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२:२० वाजता मुंबईत पोहोचेल.
वाराणसीसाठी जाणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी रेल्वेने खालीलप्रमाणे नियोजन केले आहे:
गाडी क्र. ०४२२५: २२ मे २०२६ ते १० जुलै २०२६ पर्यंत दर शुक्रवारी मुंबईहून दुपारी १४:३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ०२:०५ वाजता वाराणसीला पोहोचेल.
गाडी क्र. ०४२२६: २१ मे २०२६ ते ९ जुलै २०२६ पर्यंत दर गुरुवारी वाराणसी येथून पहाटे ०१:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२:२० वाजता मुंबईला पोहोचेल.
या दोन्ही विशेष गाड्यांना मार्गावर महत्त्वाचे थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खंडवा, इटारसी जंक्शन, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल आणि लखनऊ या स्थानकांचा समावेश आहे. वाराणसी विशेष गाडी अतिरिक्त सुलतानपूर आणि जौनपूर सिटी येथेही थांबेल. या विशेष गाड्यांच्या आरक्षणामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार असून, प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.