Mumbai Goa Road Closed
खांब : रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांतील अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी येथे महाराष्ट्र सीमलेस जिंदाल कंपनीसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तब्बल २४ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहनचालक व प्रवासी मार्गावरच अडकून पडले आहेत.
रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने काही वाहनचालक जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करत वाहने पाण्यातून बाहेर काढताना दिसत आहेत. त्यामुळे अपघाताचीही भीती व्यक्त केली जात आहे.
वाहतूक कोंडीत तासन्तास अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी कोलाड-खांब परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर, प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या वतीने महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि इतर आवश्यक मदत युद्धपातळीवर पुरविण्यात येत आहे. या मदतकार्यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला असून सामाजिक कार्यकर्त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखा आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र नाल्यातील पाण्याची पातळी अद्यापही कमी होत नसल्याने वाहतूक पूर्ववत होण्यास विलंब होत आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र सीमलेस जिंदाल कंपनीसमोरील नाल्यात कंपनी प्रशासनाने मोठ्या आकाराची लोखंडी जाळी बसविल्यामुळे पुराच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होत नसून त्यामुळेच रस्त्यावर पाणी साचत आहे. या संदर्भात कंपनी प्रशासनाची भूमिका काय असणार, तसेच पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप लक्षात घेऊन संबंधित शासकीय यंत्रणा कोणती कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.