सुवर्णा दिवेकर
अलिबाग: एसटी महामंडळाने कागदी ओळखपत्राच्या जागी २०१६ मध्ये सुरु केलेली स्मार्ट कार्ड योजना सात वर्षात बंद पडली. आता त्या जागी एनसीएमसी अर्थात (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड योजना सुरु केली आहे. प्रवासातील पारदर्शकता आणणे, डिजीटल व्यवहारांना चालना देणे, एसटीचा प्रवास कॅशलेस बनविण्यासाठी एसटी महामंडळाने पुन्हा स्मार्ट कार्ड योजना सुरु केली आहे.
एसटी महामंडळाने या योजनेच्या माध्यमातून हायटेक होण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र रायगड जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
फेब्रुवारी ते मेपर्यंत आकडेवारीनुसार अवघी ७ हजार ३९४ कार्ड सक्रिय झाली आहेत. एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड योजना सुरु केली आहे.
हे कार्ड मिळविण्यासाठी महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र स्मार्ट कार्ड मिळविताना प्रवाशांची आर्थिक लुट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
शंभर रुपये रिचार्जमधून पाच रुपयांची लुट जीएसटीद्वारे होत असताना काही एजन्सींकडून रिचार्जच्या नावाने वीस ते ५० रुपये अधिक बळकावले जात असल्याचे बोलले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवासी विशेष करून महिलांची आर्थिक लुट होत असल्याचा प्रकार समोर येत आहे.
जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी खासगी एजन्सीकडे हे काम देण्यात आले. जिल्ह्यात अलिबाग, पेण, कर्जत, उरण, पनवेल, महाड, श्रीवर्धन, मुरूड, रोहा, माणगाव मध्ये साधारणतः ३० हून अधिक एजन्सींकडे हे काम सुरु आहे.
रायगड विभागाच्या अखत्यारित २४ ठिकाणी एजन्सी आहेत. त्यामध्ये आठ आगारातील ११ स्थानकात या एजन्सी कार्यरत आहेत. काही एजन्सीमध्ये सकाळी आठ ते अकरा तर काही एजन्सीमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत या एजन्सींचे काम चालते.
एसटी महामंडळाकडून मिळणाऱ्या एनसीएमसी कार्डचा लाभ घेण्यासाठी महिला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्थानकांसह अन्य खासगी एजन्सीमध्ये नोंदणीसह कार्ड मिळविण्यासाठी गर्दी होत आहे. जिल्ह्यात महिलांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे. मात्र हे कार्ड नोंदवण्यापासून मिळेपर्यंत प्रचंड त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.