माणगाव : कमलाकर होवाळ
माणगाव आणि इंदापूर परिसरातील नागरिकांची दीर्घकाळा पासूनची प्रलंबित मागणी असलेला माणगाव बायपास रस्ता आता अंतिम टप्प्यात असून येत्या 31 मे पर्यंत हा मार्ग मुंबई आणि कोकणातील प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची ग्वाही खा. सुनील तटकरे यांनी दिली. या घोषणामुळे उपस्थितांनी माणगाव कोंडी मुक्त होणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे तसेच माणगाव शहरातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या हायमास्ट व पथदिव्यांचे उद्घाटन खासदार तटकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी माणगावच्या भविष्यातील विकासाचा व्यापक रोडमॅप नागरिकांसमोर मांडला.
माणगाव येथील हा बायपास मार्ग सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय माणगाव आणि इंदापूर येथे पर्यायी मार्ग उभारण्यासाठी अजितदादा पवार यांनी यापूर्वीच 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्या निधीच्या आधारे आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. माणगाव शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संपूर्ण शहराचा विकास आराखडा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने लवकरच नजीकच्या काळात मंजूर करून घेण्यात येणार असल्याची माहिती देत त्यांनी लवकरच भुयारी गटार योजनेलाही मंजुरी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगावला आधुनिक, स्वच्छ आणि सुबक शहर म्हणून विकसित करण्याचा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही माणगाव झपाट्याने प्रगती करत असल्याचा उल्लेख करत खासदार तटकरे यांनी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय, शिंदे सीबीएसई इंग्रजी शाळा तसेच गीता तटकरे नर्सिंग कॉलेज यांसारख्या शैक्षणिक संस्थांद्वारे तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दालने खुली केली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे समाजासाठी मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना खा. तटकरे यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवणही जागवली. “अजितदादा हे दिलेला शब्द पाळण्यासाठी कोणतीही तडजोड करत नसत. विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी ते आपल्या राजकीय प्रभावाचा उपयोग करून प्रशासनाला गती देत असत. माणगावच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय व केलेले प्रयत्न आजही नागरिकांच्या स्मरणात आहेत,” असे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अस्लम राऊत आणि उपसभापती मनीषा मालोरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमा नंतर मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी खासदार तटकरे यांनी मुस्लिम समाजाला ईदच्या तर हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्म, संस्कृती आणि विकास यांचा सुंदर संगम माणगावमध्ये पाहायला मिळाला. इफ्तारच्या या कार्यक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचे प्रभावी दर्शन घडल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. माणगावच्या विकासाची नवी पहाट उगवण्याची आशा व्यक्त करत नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माणगाव व इंदापूर परिसरातील नागरिकांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा आता संपणार असल्याचे संकेत खा. सुनील तटकरे यांनी दिले. मुंबई- गोवा मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी उभारण्यात येत असलेला माणगाव बायपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून 31 मेपर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. हा बायपास सुरू झाल्यानंतर माणगाव शहरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून मुंबईकोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माणगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही आपली जबाबदारी असून ती लवकरात लवकर प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोतखा. सुनील तटकरे