रायगड: राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढत असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. वाढत्या उन्हामुळे होणारा उष्माघात टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
हायड्रेटेड राहा आणि स्वतःचे रक्षण करा-आरोग्य विभागाने नागरिकांना तहान लागली नसली तरीही सतत पाणी पिण्याचे आवाहन केले आहे. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. लिंबू पाणी, ताक, लस्सी, ओआरएस आणि हंगामी फळांचे रस यांचे सेवन करावे. बाहेर पडताना सुती आणि फिकट रंगाचे सैल कपडे वापरावेत तसेच डोके झाकण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करावा.
दुपारी घराबाहेर पडणे टाळा- विशेषतः दुपारी 12:00 ते 3:00 या वेळेत उन्हात बाहेर पडणे टाळावे. तसेच दुपारच्या वेळी कष्टाची कामे करणे, अनवाणी बाहेर जाणे किंवा जास्त उन्हात स्वयंपाक करणे टाळावे.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
शरीराचे तापमान वाढणे, चक्कर येणे, मळमळणे, तीव्र डोकेदुखी, सतत होणारी उलटी किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या आजारी व्यक्तींनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
आणीबाणीच्या परिस्थितीत काय करावे?
एखादी व्यक्ती बेशुद्ध पडल्यास किंवा तिच्या शरीराचे तापमान खूप वाढल्यास त्वरित 108 किंवा 102 या क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधावा. डॉक्टरांची मदत येईपर्यंत संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी हलवावे आणि ओल्या कापडाने शरीर पुसून घ्यावे.
नागरिकांनी हवामानाची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सध्याच्या वाढत्या तापमानात उष्माघात टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजचे आहेत.अल्कोहोल, चहा, कॉफी आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेली शीतपेये सद्यस्थितीत टाळावीत. प्रथिनेयुक्त आणि शिळे अन्न खाणे कटाक्षाने टाळावे. ओआरएस किंवा पाणी जास्तीतजास्त प्यावे. त्यात बरोबर पार्क केलेल्या आपल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नये.- डॉ. सचिन जायभाये, फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ, मुक्ता क्लिनिक अलिबाग