पनवेल: मातीची सेवा करणारा, निसर्गाचे रक्षण करणारा आणि देशाला अन्नधान्य पुरवणारा बळीराजा हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, वीजबिल माफी तसेच विविध कृषी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात आला आहे.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे ऐतिहासिक निर्णय घेतले असून त्याबद्दल संपूर्ण शेतकरी समाज सरकारप्रती कृतज्ञ आहे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी येथे केले.
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी उत्तर रायगड जिल्हा किसान मोर्चाच्या वतीने मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या 'कृतज्ञता मेळाव्या' प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या मेळाव्याला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस व पनवेल महापालिकेचे सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, दिपके बेहेरे, पनवेल पंचायत समितीच्या रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, खालापूर पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर सांगडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री शेलार म्हणाले की, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे अशा कठीण काळात शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे आणि हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनानेही त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला आहे. या केवळ घोषणा नसून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पीएम-किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण, शेतीसाठी आवश्यक खते व साहित्याची उपलब्धता, बाजारपेठेचा विस्तार, सिंचन सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या विविध उपक्रमांमुळे शेतकरी अधिक सक्षम होत आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पुढील पिढीसाठी शेती अधिक सुरक्षित, शाश्वत आणि फायदेशीर करण्याचे काम सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बेहेरे तर आभार सागर सांगडे यांनी मानले.
आपल्या देशाचा शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया आहे. शेतकऱ्याच्या कष्टामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरात अन्न पोहोचते. मात्र अनेक वर्षे नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील चढ-उतार आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुती सरकारने या परिस्थितीची जाणीव ठेवून शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. हा निर्णय लाखो शेतकरी कुटुंबांना नवसंजीवनी देणारा आहे.- प्रशांत ठाकूर, आमदर