महाड : महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातून येणाऱ्या जलवाहिनीला ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भगदाड पडल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र नगरपरिषद प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून संबंधित ठेकेदाराला स्वखर्चाने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्यानंतर जलवाहिनी दुरुस्त करण्यात आल्याने पाणीटंचाईचे संकट टळले.
महाड ते किल्ले रायगड दरम्यान राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अक्षय कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीमार्फत गेले काही वर्षापासून सुरू आहे. नातेखिंड परिसरातील प्रलंबित कामात अडथळा असणारा अरुंद व खडकाळ भाग फोडण्याचे काम सुरू असताना निष्काळजीपणा व हलगर्जीपणा दाखविल्याने जेसीबीचा धक्का लागून ही जलवाहिनी फुटली. संबंधित ठेकेदार कंपनीमार्फत स्वखर्चाने दुरुस्ती करण्यात आल्याने सध्या पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे,मात्र वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत
असून जुनी जलवाहिनी सातत्याने नादुरुस्त होत असल्याने आणि नवीन जलवाहिनीचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात पोहोचल्याने ते काम लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीद्वारे सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामादरम्यान अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या वेळप्रसंगी नागरिकांनी रास्ता रोको देखील केला होता मात्र तरी देखील या कंपनीवर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. मागील महिन्यातही याच जलवाहिनीला भगदाड पडल्याने महाड शहराला 2 ते 3 दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाहणी करत ठेकेदार कंपनीला दुरुस्तीचे आदेश दिले.