रायगड

Raigad news: कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ४ गोवंशांची महाड MIDC पोलिसांकडून सुटका

तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल; बोलेरो पिकअपसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

महाड: महाड येथून गोरेगावकडे कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या नेल्या जात असलेल्या चार गोवंशांची महाड एमआयडीसी पोलिसांनी वेळेवर कारवाई करत सुटका केली. या प्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक बोलेरो पिकअप वाहनासह सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई शुक्रवारी (दि. १६ जानेवारी) सकाळी ५.४५ ते ६.०० वाजण्याच्या दरम्यान, मौजे नागलवाडी गावच्या हद्दीत मुंबई–गोवा महामार्गावरील सावित्री नदी पुलावर करण्यात आली. महाड एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-06 BW-9355) या वाहनास पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता, वाहनामध्ये दोन तांबड्या व दोन पांढऱ्या रंगाच्या गाई दाटीवाटीने व क्रूर पद्धतीने बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या चार गाईंंची अंदाजे किंमत सुमारे २ लाख रुपये आहे.

आरोपींनी वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना, चारापाणी व खेळती हवा न देता, वैद्यकीय तपासणी तसेच प्राथमिक उपचाराचे साहित्य न ठेवता, सदर गोवंशांची बेकायदेशीररीत्या कत्तलीसाठी गोरेगाव (माणगाव) येथील एका अज्ञात व्यक्तीकडे वाहतूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी असलम अब्दुल पेवेकर (वय ५०, रा. वरंध मोहल्ला, महाड), संतोष गंगाराम तांबे व एका अज्ञात आरोपीविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार गाई व बोलेरो पिकअप वाहन असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT