Konkan river water level 
रायगड

Konkan river water level : कोकणातील 27 पैकी 25 नद्या नियंत्रणात; रायगडमधील 'अंबा' आणि रत्नागिरीतील 'जगबुडी'ने ओलांडली इशारा पातळी

नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीमुळे संबंधित जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत

पुढारी वृत्तसेवा

रायगड : कोकण विभागातील 27 प्रमुख नद्यांपैकी तब्बल 25 नद्या सध्यातरी इशारा पातळीच्या खाली सुरक्षितपणे वाहत आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा येथील 'अंबा' नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील 'जगबुडी' नदी या दोन नद्यांनी आपली इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, रायगडच्या रोहा तालुक्यातील अंबा नदीची इशारा पातळी 8.00 मीटर असताना आज तिची पातळी 8.70 मीटरवर पोहोचली आहे, जी धोका पातळी असलेल्या 9.00 मीटरच्या अगदी जवळ आहे. तसेच, रत्नागिरीतील खेड येथील जगबुडी नदीची इशारा पातळी 5.00 मीटर असून सध्या ती 5.20 मीटरवर वाहत आहे; या नदीची धोका पातळी 7.00 मीटर आहे. या दोन्ही नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीमुळे संबंधित जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी बदलापूर (13.40 मी), जांभूळपाडा (10.50 मी) आणि मोहने (5.25 मी) येथे सुरक्षित पातळीवर वाहत आहे. टिटवाळ्यातील काळू नदी 99.60 मीटरवर तर शहापूरमधील भातसा नदी 31.10 मीटरवर असून त्या अद्याप धोक्यापासून दूर आहेत. पालघर जिल्ह्यातील सूर्या (6.70 मी), वैतरणा (97.70 मी) आणि पिंजाळ (97.80 मी) या नद्यांची पातळीही पूर्णपणे नियंत्रणात आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका (22.70 मी), सावित्री (4.00 मी), पाताळगंगा (18.80 मी), उल्हास-कर्जत (43.20 मी) आणि गाढी (3.65 मी) या नद्या सध्यातरी शांत आहेत.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. रत्नागिरीतील वशिष्टी (2.53 मी), शास्त्री (4.20 मी), सोनवी (3.80 मी), काजळी (14.65 मी), कोदवली (3.00 मी), मुचकुंदी (0.70 मी) आणि बावनदी (6.12 मी) या नद्या स्थिर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी (37.70 मी), तेरेखोल (2.10 मी), कर्ली (4.50 मी), गडनदी (35.00 मी) आणि वाघोटन (5.60 मी) या सर्व नद्या इशारा पातळीपेक्षा बऱ्याच खाली वाहत आहेत. संपूर्ण कोकण विभागात 27 नद्यांपैकी केवळ 2 नद्या वगळता सर्व नद्यांची पातळी नियंत्रणात असल्याने सध्या पूरस्थिती नसली, तरी नागरिकांनी आणि पर्यटकांनी नद्यांच्या पात्राजवळ जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT