ऋषिता तावडे
रायगड : सद्यस्थितीत कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी सेवा अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याकरिता कोकण रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, त्याच बरोबर कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाकरिता कोकण रेल्वे महामंडळाने केंद्र सरकारकडे निधीचा प्रस्ताव सादर केला आहे.
विद्यमान प्रवासी सेवा प्रभावी करण्याकरिता सिग्नल यंत्रणा सक्षम करण्यासाठी ९९.६८ कोटी खर्चून ‘कवच’ सुरक्षा प्रणाली बसवली जाईल. ११ रेल्वे फाटकांच्या जागी उड्डाणपूल उभारून मानवरहित फाटकांचा प्रश्न २७१.२२ कोटी खर्चून सोडविला जाईल. रेल्वे वहनक्षमता वाढावी म्हणून नवीन क्रॉसिंग स्टेशन तर गोकर्ण रोड, होन्नावर, बारकूर, हरवाडा व अंकोला येथे ४२५.५५ कोटी खर्चून लूप लाईन उभारण्यात येत आहे. तर १०४.९८ कोटीं रुपये खर्च करुन विविध सुविधा दिल्या जातील.
जुन्या ट्रॅक बदलासाठी ३६३.८२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. भूस्खलनप्रवण २० ठिकाणी जिओ - टेक्निकल स्थिरीकरण, विविध बोगद्यांची देखभाल तसेच ४८ स्थानकांवरील जुन्या इंटरलॉकिंग यंत्रणांच्या जागी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीसाठी ३०१.२५ कोटींचा प्रस्ताव आहे. मुंबई, गोवा, कर्नाटक आणि केरळला जोडणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत.