ऋषिता तावडे
रायगड: कोकणात पावसाळा सुरू झाला की, निसर्गाच्या कुशीत कोणत्याही रासायनिक खतांशिवाय आणि मानवी मशागतीशिवाय निसर्गतःच अनेक औषधी व पौष्टिक रानभाज्या उगवतात. या रानभाज्या माणसाला आरोग्यवर्धक असल्याने कोकणी खाद्यसंस्कृतीमध्ये या रानभाज्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
पावसाळा आला की वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या येतात. रानभाज्या म्हणजेच आपसूक येणार्या भाज्या. त्या खाण्या योग्य असतात. त्यात टाकळा, भारंगी, कुर्डू, फोडशी, कोचींदा कांदा, करमळ, शेवळं, करटोली, बांबूचा कोंब, कुडा, अळंबी/ मशरूम, अंबाडी, आळू -रानटी आळू तसेच वेगवेगळ्या प्रकारचे रोवण सुद्धा येतात.
रानभाज्या पूर्णपणे नैसर्गिक आणि रासायनिक खतांशिवाय असल्याने आरोग्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि पौष्टिक असतात. प्रत्येक भाजीचा आपल्या शरिराला फायदा असतो. म्हणून कोकणातील प्रत्येक घरात या रानभाज्यांची भाजी आणि आमटीही केली जाते. कोचिंदा कांदा हा पानापाना सारखा असतो, आजकाल कमी ठिकाणी येतो.
कोचिंदा कांदा खाल्ला तर पोटातील कृमी असतात ते मरतात त्यामुळे कोचिंदा कांद्याची भाजी खाणे गरजेची आहे. सहजासहजी मिळणार्या भाज्या म्हणजे टाकळा आणि भारंगी. पावसाच्या पहिल्या-दुसऱ्या सरी पडल्यानंतर जंगलात जमिनीतून शेवळ्याचे कोंब वर येतात.
ही भाजी अत्यंत चवदार असते. शेवळ्यामध्ये खाज असते, त्यामुळे ही भाजी बनवताना त्यात भरपूर चिंच/कोकम वापरले जाते. यात फायबर (तंतुमय पदार्थ) मुबलक प्रमाणात असते आणि पोटाच्या विकारांवर ही गुणकारी आहे.
तसेच टाकळा रस्त्याच्या कडेला, माळरानावर टाकळ्याची लहान झाडे मोठ्या प्रमाणात उगवतात. याची फक्त कोवळी पाने भाजीसाठी खुडली जातात. टाकळ्याची भाजी आरोग्यासाठी उष्ण असते, म्हणून ती पावसाळ्यात खाणे फायदेशीर ठरते. त्वचाविकार, पोटाचे जंत आणि खोकल्यावर ही भाजी अत्यंत औषधी आहे.
करटोली / कर्टुली हि वेलवर्गीय रानभाजी असून याला लहान काटेरी कारल्यासारखी फळे येतात. ही भाजी चवीला अजिबात कडू नसते, उलट अत्यंत चविष्ट लागते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि लोह (Iron) असते. डायबिटिज (मधुमेह) असलेल्या रुग्णांसाठी ही उत्तम आहे. भारंगी हि डोंगराळ भागात झुडपांसारखी असतात.
या झाडाला फुटणारे कोवळे तुरे आणि पाने आणि निळी फुले भाजीसाठी वापरतात. कफ, दमा आणि श्वसनाच्या त्रासावर ही भाजी गुणकारी मानली जाते. कुर्डू हि शेताच्या बांधावर आणि मोकळ्या जागेत पांढरट-गुलाबी रंगाची फुले आणि हिरवी पाने असतात.
याची कोवळी पाने तोडून सुकी भाजी केली जाते.या भाजीभूळे किडनी स्टोन (मुतखडा) आणि लघवीच्या त्रासावर कुर्डूची भाजी अतिशय गुणकारी मानली जाते. फोडशी ही गवतवर्गीय भाजी आहे. ही दिसायला हिरव्या पातीसारखी असते. हिची कांदा घालून केलेली सुकी भाजी आणि भजी केली जाते.
तसेच बांबूचे कोंब- बांबूच्या बेटांमधून ताजे कोवळे कोंब बाहेर येतात, ज्याला कोकणात 'किल्ल' किंवा 'बांबूचे कोंब' म्हणतात. हे कोंब बारीक चिरून २-३ दिवस पाण्यात भिजत घालावे लागतात (त्यातील चव संतुलित करण्यासाठी) आणि मग त्याची भाजी किंवा लोणचे बनवले जाते.
भारंगी ही चवीला थोडी तुरट असली तरी ती अत्यंत गुणकारी आहे. हिची कोवळी पाने आणि कळ्यांची भाजी केली जाते. कफ, खोकला आणि दम्याच्या त्रासावर ही भाजी गुणकारी मानली जाते. कुडा हि चवीला थोडी कडू असते, कुड्याच्या झुडपाला पावसाळ्यात पांढरी शुभ्र फुले आणि कळ्या येतात. ही भाजी बनवताना पाण्यात उकळून पाणी काढून टाकले जाते.
ही भाजी पोटातील जंत नष्ट करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी उत्तम आहे. अंबाडी ही भाजी चवीला आंबट असते. हिच्या पानांची पातळ भाजी किंवा चटणी केली जाते. अंबाडीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे अॅनिमिया (रक्तपांढरी) सारख्या आजारांवर ही फायदेशीर ठरते. रानटी आळू हे पावसाळ्यात ओढ्याकाठी किंवा दमट जागी रानटी आळू मोठ्या प्रमाणात उगवतो. अळूची पातळ भाजी किंवा वड्या केल्या जातात. हा आळू खाताना घशात खाज सुटू नये म्हणून चिंचेचा कोळ भरपूर वापरला जातो.
रानभाज्यांमध्ये निसर्गाचे औषधी गुणधर्म ठासून भरलेले असतात. मात्र, बाजारातून घेताना किंवा रानातून काढताना जाणकार व्यक्तीकडून त्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे, कारण काही वनस्पती दिसायला रानभाज्यांसारख्याच पण विषारी असू शकतात. आपण रानभाजी जेव्हा खुडतो त्यावेळी तशाच दिसणारी झाडेही तिथे असतात त्या खाण्यायोग्य नसतात.
जिथे रानभाजी असते तिथेच असलेली रानटी झाडे दिसायला सारखीच असतात त्यांच्यात थोडासाच फरक असतो. थोडासाच आकारात फरक असतो, फुलांमध्ये किंवा पनांच्या ठेवणीमध्ये फरक असतो. हे ओळखणे गरजेचे आहे. तो शरिराला हाणीकारक ठरू शकतात. त्याच प्रकारे टाकळा दोन प्रकारचा असतो.
खाण्यायोग्य असलेला टाकळा असतो तो गोल पाणांचा असतो आणि खायला नको असलेला जो टाकळा असतो तो टोकदार पाणांचा असतो. भारंगीच्या भाजीला निळसर फुले असतात.कोवळ्या पाणांसोबत फुलेही भाजीत घ्यायची असतात. या रानभाज्यापासून भाजी, आमटी, काही भाज्यांची भजी किंवा वड्याही करून आपल्या जेवणात घेवू शकतो.