मोठ्या मोहोरानंतरही कोकणात आंब्याला फळधारणा कमीच  pudhari photo
रायगड

Konkan mango crop: अतिथंडी, ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक चिंतेत; योग्य नियोजन का गरजेचं?

अति थंडी, ढगाळ वातावरणाचा परिणाम, दुसऱ्या टप्प्यातील मोहोराचे काटेकोर नियोजन आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः किशोर सुद

यावर्षी कोकणात डिसेंबर महिन्यापासून सुरु झालेल्या समाधानकारक थंडीमुळे आंबा पिकावर चांगला परिणाम दिसून येत आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम दिलासादायक ठरण्याची चिन्हे दिसत असताना थंडीची तिव्रता वाढतच आहे. तसेच कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

याचा परिणाम फळधारणेवर होत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगले उत्पादन अपेक्षित असले तरी पिकाचे व्यवस्थापन आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे. मार्चच्या मध्यापासून हापूसचा हंगाम सुरू होण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे.

महाराष्ट्रात 5 लाख 66 हजार हेक्टरवर आंब्याची लागवड असून 3.31 लाख मेट्रिक टन आंबा फळांचे उत्पादन आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयात हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 13 हजार हेक्टर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 33 हजार 475 हेक्टर आणि रायगड जिल्ह्यात 14 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे. यातून 2 लाख 60 हजार 500 मेट्रिक टन उत्पादन मिळते. हेक्टरी उत्पादकता 2.50 मेट्रिक टन आहे.

आंबा पिकाचे काटेकोर नियोजन केल्याने आम्ही जानेवारीमध्येच आंब्याची पेटी वाशीच्या एपीएमसी बाजारात पाठवू शकलो आहोत. हा उत्तम प्रतिचा आंबा आहे. या एका पेटीला (दोन डझन) सुमारे पाच हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. सध्या आंब्याला चांगला मोहोर येत असला तरी जास्त काळ अतिथंडी, ढगाळ वातावरण यामुळे फळधारणा कमी होत असून शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय आहे.
गौरव पाटील, आंबा उत्पादक शेतकरी, नारंगी, ता. अलिबाग
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोहोर जास्त प्रमाणात आहे. मात्र फळधारणा कमी आहे. आंब्याला दोन ते तीन टप्प्यात मोहोर येऊन फळधारणा होते. दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला चांगली फळधारणा होण्याची शक्यता आहे. फवारण्यांचे नियोजन, तापमानातील चढउतार याचा आंबा पिकावर परिणाम होतो. चांगल्या मोहोरामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पिकाचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. 15 एप्रिलपासून आंबा बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
शिवकुमार सदाफुले, कृषी अधीक्षक, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT