आनंद सकपाळ
नेरळ: जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिनाचे औचित्य साधत कोल्हारेवाडीतील आदिवासी महिलांनी दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे. वाडीमध्ये सुरू असलेल्या दारूविक्रीला पूर्णपणे आळा घालून कोल्हारेवाडी १०० टक्के दारूमुक्त करावी, या मागणीसाठी महिलांनी एकजूट दाखवत नेरळ पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांची भेट घेऊन महिलांनी निवेदन साद केले.
कोल्हारेवाडीतील बहुतांश कुटुंबे मोलमजुरी, रोजंदारी आणि कष्टाच्या कामावर उदरनिर्वाह करतात.
हातावर पोट असलेल्या या कुटुंबातील कष्टाने कमावलेला पैसा दारूच्या व्यसनामुळे वाया जात असून, त्याचा थेट परिणाम कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर होत असल्याचे महिलांनी निवेदनातून मांडले. दारूच्या व्यसनामुळे घराघरात वाद, कौटुंबिक कलह आणि सामाजिक समस्या वाढत असल्याची त्यांची तक्रार आहे.
दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहेत, आता गप्प बसणार नाही. अशी भूमिका घेत महिलांनी वाडीतील दारूविक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली. दारूमुळे काही कुटुंबांमध्ये संसार मोडण्याच्या घटनाही समोर आल्याचा दावा महिलांनी केला.
त्यामुळे केवळ दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई न करता दारूमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक दुष्परिणामांवरही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे उपस्थित होते. दारूमुळे कुटुंबांची होणारी वाताहत थांबवा, अशी मागणी करत महिलांनी पोलीस प्रशासनाने दारूविक्रीविरोधात ठोस आणि प्रभावी कारवाई करावी, असे आवाहन केले.
चार गावे एकत्र
कोल्हारेवाडीपुरतीच नव्हे, तर कोल्हारे, धामाते, भोपेले आणि तलवडे या गावांमध्ये सुरू असलेली देशी-विदेशी दारूविक्रीही पूर्णपणे बंद करण्याची मागणी महिलांनी नेरळ पोलिसांकडे केली आहे. दारूविक्रीला आळा बसल्यास कुटुंबातील आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच घरगुती वाद आणि सामाजिक समस्या कमी होण्यास मदत होईल, अशी या आदिवासी महिलांची भावना आहे.
सामाजिक प्रश्नावर आवाज
जागतिक आदिवासी दिन हा केवळ सांस्कृतिक उत्सवापुरता मर्यादित न ठेवता आदिवासी समाजासमोरील ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविण्याचा निर्णय कोल्हारेवाडीतील महिलांनी घेतला. पारंपरिक संस्कृती आणि अस्मिता जपतानाच आपल्या कुटुंबांचे आणि समाजाचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी महिलांनी दारूमुक्तीचा निर्धार व्यक्त केला.