अलिबाग: गणेशोत्सव तोंडावर आला असताना खारपाडा टोलनाका बंद करण्याची मागणी जोर धरतेय. याबाबत पालकमंत्री भरत गोगावले यांनी उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून टोल थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “रस्ता पूर्ण झाला, बिनधास्त टोल घ्या, आमचा विरोध नाही,” असे म्हणत अपूर्ण रस्त्यासाठी टोल आकारण्यास गोगावलेंनी विरोध दर्शवलाय.
दरम्यान, त्यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी रोह्यात अधिक लक्ष देणार असल्याचे आणि म्हसळ्याची हंडी फोडणार असल्याचे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले यांनी विकास गोगावले हे विकासकामांच्या संदर्भातच बोलले आहेत, दुसरं काही नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या सोबत आले असल्यास त्यांच्या भागातही विकासकामांसाठी निधी दिला जाईल, असं त्यांनी सांगितले.
तर कर्जतमधील अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याच्या तक्रारीवर भरत गोगावले यांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय. याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून, हा विषय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चेला आला असल्याचं गोगावलेंनी सांगितले.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र महामार्गावर टोल वसुली सुरू झाल्याने रायगड जिल्ह्यातील नागरिकांसह कोकणवासियांमध्ये नाराजी आहे. महामार्गावर सध्या टोल वसुली बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.