मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी 20 सप्टेंबरपासून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. हा बोगदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 5 सप्टेंबरपासून वाहतुकीस मोकळा केला होता.
गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून हलकी प्रवासी वाहने सोडण्यात आली होती; मात्र त्यानंतर पुन्हा येथील वाहतूक बंद करण्यात आली. बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू होते. यंदा 25 फेब्रुवारीपासून शिमगोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना या बोगद्याचा वापर कोकणात येण्यासाठी करण्याची परवानगी देण्यात आली. एक वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईहून कोकणात जाणार्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत झाला होता. कशेडी घाटातील 45 मिनिटांचा वळणावळणाचा वेळ वाचला होता. इंधनाची बचतीसह वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळाली होती.
पाच दिवसांचे गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशी झाल्यानंतर परतीचा प्रवास सुखाचा व्हावा या दृष्टीने राष्ट्रीय बांधकाम विभाग आणि स्थानिक वाहतूक पोलिस यांनी योग्य नियोजन केले होते. त्यामुळे या परिसरात कुठेही वाहतूककोंडी झालेली नाही. गौरी गणपती विसर्जन आटपून परतणार्या चाकरमान्यांना वाहतूककोंडीचा फारसा फटका बसला नाही.
कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन्ही बोगद्यातील खबरदारीचा उपाय म्हणून बांधकाम खात्याने विशेष काळजी घेतली. दोन्ही बोगद्यातून प्रवास करताना वाहनांचा वेग कमी ठेवण्यात आला होता. दोन्ही बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामुळे कशेडी घाटातून येण्याचा चाकरमान्यांचा वेळ वाचला आहे.
कशेडी बोगद्याच्या अपूर्ण असणारी गटार लाईन, दर्शनी भाग, संरक्षक भिंत, अपूर्ण सिमेंट काँक्रीटीकरणचे कामासह लाईट, डिजिटल वेग टायमिंगची कामे पूर्ण करायची असल्याने गणपती उत्सव संपताच घाई घाईने सुरू करण्यात आलेला बोगदा पूर्णत्व करण्याच्या उद्देशाने पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे.