धनराज गोपाळ
पोलादपूर शहर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कशेडी घाटातील २००५ पासून खचणाऱ्या १०५ मीटरच्या 'डेंजर झोन' रस्त्यावर १५ मेपर्यंत काम पुर्ण होणे अपेक्षित असताना अमेरिका इराण युद्धामुळे कशेडी घाटातील 'डेंजर झोन'चे काम रखडलेअसल्याचा दावा जय भारत ठेकेदार कंपनीचे अमित चंदनानी यांनी केला आहे. आगामी पावसापुर्वी रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास स्थानिकांकडून उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मागील वेळी प्रमाणे खचणारा 'डेंजर झोन'चा भराव करण्यासाठी दोनशे मीटर अंतरावर दगडखाणीत स्फोटकांचा वापर झाल्याने अतिवृष्टी काळात जुन्या कशेडी घाटातील रस्त्यावर डोंगरातून भुस्खलन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यासंदर्भात जय भारत ठेकेदार कंपनीतर्फे अमित चंदनानी यांनी अमेरिका आणि इराण दरम्यानच्या युध्दपरिस्थितीमुळे आवश्यक इंधन डिझेल व जिओसिन्थेटीक कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला नाही. महामार्ग बांधकाम विभागाच्या निर्देशानुसार सर्व बांधकाम सामुग्री खचणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी आणण्यासाठी अतिशय कष्ट व विलंब झाला.
जिथपर्यंत कातळ आहे तिथपर्यंत दरवर्षी आणणारा 'डेंजर झोन'चा १०५ मीटरचा कशेडी घाटातील रस्ता खोदून काढला. यावेळी दरवेळी केलेल्या डांबरीकरणाचे सुमारे १२ ते १५ बीटूमीन रस्त्याचे थर दिसून आले.
आयआयटी मुंबईच्या मार्गदर्शनाखाली तसेच तंत्रज्ञांनी दिलेल्या निर्देशानुसार झिंक व अल्युमिनियम कोटेड जाळ्यांचे नेटवर्क तयार करून त्यामध्ये हार्ड रॉक्सचे गॅबियन स्ट्रक्चर करून त्याला डोंगरातील कातळात १५ ते २० ड्रील करून त्यामध्ये ३० मीमी स्टील बार फिट करण्यात आले असल्याने ४५ अंशात्मक कातळातून हे गॅबियन स्ट्रक्चर सुमारे १० ते १५ वर्षे निसटणार नाही.
परिणामी, यावर्षीचे 'डेंजर झोन'चे काम कायमस्वरूपी टिकाऊ असेल, अशी माहिती दिली. याठिकाणी नैसर्गिक भूजलस्त्रोत असून यातील पाणी अतिक्षारयुक्त असल्याने स्टील गंजून नष्ट होत असे. मात्र झिंक व अल्युमिनियम कोटेड जाळ्या या क्षारयुक्त भुजलामुळे गंजणार नसल्याचे जय भारत ठेकेदार कंपनीचे अमित चंदनानी यांनी सांगितले.
यावेळी कोंढवीचे माजी सरपंच सुहास मोरे यांनी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, महाविद्यालय, बाजारहाट यासाठी १२ गावांसह २८ वाड्यावस्त्यांचे जनजीवन या 'डेंजर झोन'चे काम रखडल्याने रस्ता संपर्क तुटून बाधित होणार आहे.
जय भारत ठेकेदार कंपनीतर्फे या जनतेसाठी खासगी प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी स्थानिकांच्या वतीने करून पावसाळ्यात रस्ता बंद ठेवण्याची वेळ ओढवली तर उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. याप्रसंगी पळचिलचे माजी सरपंच उमेश मोरै व सनी जाधव आदींनी उपस्थित राहून जय भारत ठेकेदार कंपनीतर्फे अमित चंदनानी यांना स्थानिकांच्या गैरसोयीबद्दल कडक शब्दात सुनावले.
माती आणि कातळातील एकजिनसीपणा नष्ट
'डेंजर झोन'पासून दोनशे मीटर अंतरावर दगडखाणीत स्फोटकांचा वापर करून गॅबियन स्ट्रक्चर मध्ये दगडांचा भराव केला जात आहे. या स्फोटकांच्या स्फोटामुळे माती आणि कातळातील एकजिनसीपणा नष्ट होऊन अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असून नजीकच्या काळात अशा प्रकारच्या आपत्तीला जय भारत ठेकेदार कंपनी जबाबदार राहील, असा इशारा स्थानिकांनी दिला.
भूस्खलनाचा धोका वाढला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या जुन्या कशेडी घाटातील खचणाऱ्या १०५ मीटर 'डेंजर झोन' रस्त्यावर १४ ते १६ मीटर उभा छेद दिल्यानंतर दिसणारे १० ते १५ डांबरीकरणाचे रस्त्याचे बीटुमीन तर आणि २०० मीटर लगतची ब्लास्टींग होणारी खाण यामुळे यंदा भूस्खलनाचा धोका वाढला आहे.