2024 हे वर्ष पर्यावरण प्रेमींसाठी खूप खास आहे. संपूर्ण जगात फक्त सह्याद्रीत सात वर्षातून एकदा फुलणारी कारवी खारघरच्या डोंगरावर बहरली आहे. त्यामुळेच पर्यावरणप्रेमी डोंगर दर्यांमध्ये भटकंती करत आहेत. पण याच सात वर्षातून एकदा फुलणार्या कारवीला यंदा एक वेगळेच ग्रहण लागले आहे. ते ग्रहण म्हणजे समाजमाध्यमावर झालेला नको तेवढा प्रसार. रिल्स बनवणार्यांना कारवी फुलली हे सांगायचा अवकाश आणि हौशे लोक सहज कारवी दिसणार्या जागांवर अक्षरशः हैदोस घालायला लागलेत.
चक्क दुचाकी-चार चाकी नेऊन मोठ्या आवाजात कारवीच्या माळरानांवर गाणी लावून नंगानाच सुरु असल्याचे दिसून येते. मात्र काहीजण पर्यावरण रक्षणाचे आणि सोबत जनजागृती सुध्दा तेवढ्याच हिरीरीने करत आहेत.
पनवेल येथील सुदीप आठवले आणि त्यांची अनुभूती नावाची संस्था हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. लहानपणापासून पर्यावरण रक्षणाचे धडे मिळाल्यामुळे निसर्ग संवर्धन आणि जनजागृती हे रक्तातच होते, तेच आता इतरांनाही प्रेरणा देण्याचे काम चालू आहे. कारवी फुलली म्हणून अति उत्साहाने हुरळून न जाता, पनवेलपासून अगदी जवळच असलेल्या एका जागी लोकांना कारवी तसेच इतर निसर्गसौंदर्य दाखवायला नेले, परंतु येणार्या प्रत्येकाने पान, फुल इत्यादि कशालाही हातही न लावता आनंद कसा घ्यायचा हे स्वतः दाखवून तर दिलेच, परंतु सोबत आलेल्यांकडून तसे वर्तन सुद्धा करवून घेतले. त्यामुळे येणारे नागरिक खूष आणि निसर्गाला बाधाही होणार नाही.