कर्जत: कर्जत नगरपरिषदेकडून नागरिकांना जो जलवाहिनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो तो दूषित आणि गढूळ पाणी असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे नगर परिषद हद्दीत जलशुद्धीकरण केंद्र असूनही नागरिकांना गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याने नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे जर असेच सुरू राहिले तर या विरोधात नगर परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.
कर्जत न.प.हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याशी नगरपरिषद प्रशासन खेळत आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या घराघरात दूषित, दुर्गंधीयुक्त आणि पिवळे पाणी येत आहे. या दूषित पाण्यामुळे आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता आणि नवजात बाळे यांची अवस्था बिकट झाली आहे.
पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, पोटदुखी वाढली आहे. नवजात बाळांनाही जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे. तरीही प्रशासन गप्प आहे. याला जबाबदार कोण? हा प्रश्न प्रत्येक घरात विचारला जात आहे.नगरपरिषद आणि आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या की उत्तर एकच दुरुस्तीचे काम सुरू आहे, पाहणी केली आहे"पण महिना उलटून गेला तरी पाण्याचा दर्जा सुधारला नाही.
आरोग्य विभाग खऱ्या अर्थाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार कधी?"असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. पाणी तपासणी, शुद्धीकरण आणि पाईपलाईन दुरुस्ती ही फक्त कागदावरच दिसते. सहनशीलतेचा अंत झाल्याने नागरिकांनी आता थेट इशारा दिला आहे."जर लवकरात लवकर स्वच्छ पाणी पुरवठा केला नाही, तर आम्ही दूषित पाणी बाटल्यांमध्ये भरून नगरपरिषदेवर मोर्चा काढू. आणि हेच दूषित पाणी सर्व नगरसेवकांना पाजू.असा इशारा महिलांनी प्रशासनाला दिला आहे .
जनतेच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नगरपरिषदेमध्ये बसलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला दिलेला नाही" अशी आक्रमक भूमिका महिला रेश्मा जाधव यांनी घेतली आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा कर्जतकरांचा उद्रेक होणार हे नक्की.