कर्जत: सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा, पावसाळ्यात फेसाळत कोसळणारे धबधबे, निसर्गरम्य दऱ्या-खोऱ्या आणि विकसित झालेली फार्महाऊस व रिसॉर्ट संस्कृती यामुळे कर्जत तालुक्याने राज्याच्या पर्यटन नकाशावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पावसाळी पर्यटनासाठी दरवर्षी मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून हजारो पर्यटक कर्जतमध्ये दाखल होत असतात. मात्र, वाढत्या पर्यटनाचा गैरफायदा घेत ऑनलाइन रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत, लोणावळा आणि खोपोली परिसरातील अनेक रिसॉर्ट व फार्महाऊसच्या नावाने सोशल मीडियावर बनावट पेज तयार करून काही भामटे पर्यटकांकडून आगाऊ रक्कम उकळत आहेत. आकर्षक सवलती, कमी दरात लक्झरी रिसॉर्टचे आमिष आणि खोट्या एजंटांच्या माध्यमातून पर्यटकांना जाळ्यात ओढले जाते. पैसे जमा झाल्यानंतर संबंधित व्यक्ती मोबाईल बंद करून किंवा संपर्क तोडून गायब होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
अलीकडेच एका पर्यटकांन त्यांच्यासोबत अशाच प्रकारची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी संबंधित संभाषणाचे स्क्रीनशॉट आणि इतर पुरावे समाजमाध्यमांवर शेअर करत इतर पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकारांची गंभीर दखल घेत कर्जत भूमिपुत्र फार्म मालक संघटनेने समाजमाध्यमांवर जनजागृती मोहीम सुरू केली आहे. पर्यटकांनी कोणतेही ऑनलाइन बुकिंग करण्यापूर्वी संबंधित रिसॉर्ट किंवा फार्महाऊसच्या मालकाशी थेट संपर्क साधावा, यूपीआय आयडी व बँक खात्याची पडताळणी करावी, प्रॉपर्टीचे लाइव्ह लोकेशन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे खात्री करूनच आगाऊ रक्कम भरावी, असे आवाहन संघटनेने केले आहे.
संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील म्हणाले, पावसाळा सुरू होताच कर्जतमधील बहुतांश रिसॉर्ट आणि फार्महाऊस फुल बुक होतात. याच संधीचा गैरफायदा घेत काही फसवणूक करणारे बनावट बुकिंगच्या माध्यमातून पर्यटकांना गंडा घालत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी कोणत्याही आकर्षक ऑफरला भुलू नये. संबंधित मालकाशी थेट संपर्क साधून सर्व माहितीची शहानिशा केल्यानंतरच बुकिंग करावे. संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी.
सोशल मीडियावरील जाहिरातींवर आंधळा विश्वास
पर्यटनस्थळांची वाढती लोकप्रियता आणि डिजिटल व्यवहारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, पर्यटकांनी सोशल मीडियावरील जाहिरातींवर आंधळा विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमातूनच बुकिंग करणे, व्यवहारापूर्वी सर्व माहितीची खातरजमा करणे आणि फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.