कर्जत : हेमंत देशमुख
कर्जत रेल्वे स्थानकात उपलब्ध असलेल्या सुविधाही प्रवाशांना मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे. अनेक वेळा येथील ब्रिजवर जाण्यास उपलब्ध असलेली लिफ्टच (सरकता जिना) बंद असतो. तसेच स्थानकातील प्रसाधन गृहात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असते. स्थानक परिसरात गर्दुल्ले भिकारी यांचा वावर असतो.
याच बरोबर कधीकधी मेल-एक्सप्रेस ये-जा करणाऱ्या वेळ दर्शविणाऱ्या दिशादर्शकही चुकीची माहिती दर्शवीत असल्याचे मागील काळात दिसून आले आहे. वारंवार मागणी करून सुद्धा त्याकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कर्जतच्या स्मार्ट रेल्वेस्थानकाचे स्वप्न हवेतच विरले आहे. सर्व गोष्टीमुळे कर्जत रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महत्त्वाच्या गाड्या स्थानकात थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोयी होत आहे.
कर्जत रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे दुहेरी जंक्शन आहे. येथून कर्जत–खोपोली तसेच कर्जत–पनवेल हे रेल्वेमार्ग जोडलेले आहेत. पुणे, कोकण, पनवेल, मुंबई तसेच कल्याण या दिशेने ये-जा करणाऱ्या अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्या या मार्गावरून जातात. त्यामुळे सर्व प्रमुख मेल व एक्स्प्रेस गाड्यांना कर्जत रेल्वे स्थानकावर नियमित अधिकृत थांबा देण्यात यावा अशी मागणी मागील कित्येक वर्षापासून प्रवाशांनी रेल्वे पॅसेंजर असोसिएशन, खासदार, रेल्वे राज्यमंत्री यांच्या माध्यमातून भेट घेऊन तसेच निवेदनाद्वारे सुद्धा केलेली आहे.
मात्र खेदाची बाब म्हणजे आज तगायात या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. दरवेळेस प्रयत्न करू अशी फक्त आश्वासनेच रेल्वे विभागाकडून दिली जातात यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाकडून ठराविक रेल्वे स्टेशन स्मार्ट रेल्वे स्टेशन म्हणून घोषित झाली होती तेव्हा मध्य रेल्वे वरील कर्जत जंक्शन हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक हे स्मार्ट होणार म्हणून प्रवासी सुखावले होते मात्र त्यांचे हे स्वप्न आत्ताची सद्यस्थिती पाहता हवेतच विरले आहे असेच म्हणता येईल. कर्जत हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहर असल्यामुळे येथून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात.
या प्रकल्पामुळे होऊ शकतात पुढील फायदे
कल्याण जंक्शनवरील रेल्वे वाहतुकीचा ताण कमी होईल.
प्रवासाचा वेळ तसेच विद्युत ऊर्जेची बचत होईल.
कसारा–कर्जत आणि कर्जत–कसारा या मार्गावर युनिट लोकल सेवा सुरू करता येतील.
मालगाड्या व प्रवासी गाड्यांचे संचालन अधिक सुरळीत होईल.
प्रवासी तसेच रेल्वे प्रशासन या दोघांचाही वेळ व खर्च वाचेल.
या सुधारणा होणे आवश्यक
सर्व मेल व एक्स्प्रेस गाड्यांना कर्जत रेल्वे स्थानकावर नियमित थांबा देण्यात यावा. कर्जत आरक्षण केंद्रातून सर्व मेल व एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण तसेच तिकीट उपलब्ध करून देण्यात यावे. देशातील कोणत्याही भागासाठी ब्रेक जर्नी उदाहरणार्थ लखनऊ मुंबई ट्रेनला कल्याणला उतरल्यावर कल्याणहून युनिट लोकलने कर्जतला यायला मिळावे सुविधेसह तिकीट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी. ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणे रेल्वे प्रवास भाड्यात सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी. मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्येही लोकल गाड्यांप्रमाणे पुढील स्थानकाची माहिती हिंदी, मराठी, स्थानिक राज्यभाषा आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात यावी. प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी स्वच्छ व पुरेशा क्षमतेची स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात यावी.
प्रत्येक रेल्वे डब्यात योग्य वायुवीजनासाठी एक्झॉस्ट फॅनची व्यवस्था करण्यात यावी. पूर्वीप्रमाणे कर्जत-सीएसएमटी कर्जत- पुणे मेल/एक्स्प्रेस पास सुविधा पुन्हा सुरू करण्यात यावी. सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांना त्या पास ने प्रवास करण्याची परवानगी असावी. 'आपटा-पनवेल-सीएसएमटी, आपटा -पनवेल -ठाणे तसेच आपटा- पनवेल- गोरेगाव या लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात. यामुळे पाताळगंगा एमआयडीसीमधील कर्मचारी तसेच प्रवाशांना मोठी सुविधा मिळेल.' याशिवाय कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाला कोकण रेल्वेशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी चिखले स्थानक ते सोमाटणे स्थानक या दरम्यान रेल्वे बायपासचा प्रस्ताव अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. भविष्यातील रेल्वे वाहतूक व विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल.
रेल्वे स्थानकावर प्रसाधनगृहामध्ये पाण्याची कमतरता, अस्वच्छता परिणामी पसरणारी दुर्गंधी, रेल्वे स्थानक परिसरात असणारे गर्दुल्ले,भिकारी आदींमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.
भारतीय रेल्वेकडून सुरू असलेले आधुनिकीकरण व विकासाचे कार्य हे नक्कीच चांगले आहे. मात्र कर्जत रेल्वे स्थानकाबाबत हे चित्र विदारक आहे. येथील प्रवाशांना या आधुनिकरणाचा किंवा होणाऱ्या विकासाचा कोणताही लाभ मिळत नसून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अरुण गांगल, जागरूक नागरिक