कर्जत : राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-अ वरील कर्जत बायपासचा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुनील गोगटे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बायपासबाबत सविस्तर चर्चा केली.
या चर्चेअंती मंत्री गडकरी यांनी डीपीआर तातडीने पूर्ण करून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे आश्वासन दिल्याने कर्जतकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात गोगटे यांनी सांगितले की, कर्जत बायपाससाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.
याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. तसेच बायपासचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करून तो वार्षिक आराखड्यात समाविष्ट करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.
मात्र सध्या डीपीआर तयार करण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने संपूर्ण प्रकल्प रखडला आहे. यामुळे कर्जत शहरातील नागरिकांना दररोज भीषण वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय, वाढते प्रदूषण आणि अपघातांच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
त्यांनी पुढे मागणी केली की, डीपीआर तयार करणाऱ्या एजन्सीला तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. तसेच संबंधित मुख्य अभियंत्यांना प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया जलद पूर्ण करण्याच्या सूचना देऊन कर्जत बायपासच्या प्रत्यक्ष कामास लवकरात लवकर सुरुवात करावी.
माजी नगरसेवक सुनील गोगटे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवेदनाची गंभीर दखल घेतली. त्यांनी उपस्थित सहकारी अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना तात्काळ सूचना दिल्या."डीपीआरचे काम जलदगतीने पूर्ण करून कर्जत बायपास प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे," असे आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिले.