कणे-कोप्रोली ग्रामस्थांचे खाडीत उतरून जलसमाधी आंदोलन  pudhari photo
रायगड

Raigad civic protest : कणे-कोप्रोली ग्रामस्थांचे खाडीत उतरून जलसमाधी आंदोलन

कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाअंतर्गत निकृष्ठ दर्जाची खारबंदिस्ती; तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

वढाव : प्रकाश माळी

पेण तालुक्यातील कणे-कोप्रोली खारबंदीच्या नूतनीकरणाच्या कामातील विलंब, निकृष्ट दर्जा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षा विरोधात काल बुधवारी ग्रामस्थांनी अभूतपूर्व आंदोलन करत खाडीत उतरून जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न केला.

कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पा अंतर्गत सुरू असलेल्या या कामा बाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागा कडून ठोस कारवाई न झाल्याने संतप्त नागरिक मोठ्या संख्येने कणे खाडी परिसरात एकत्र जमले. खारबंदिस्तीचे काम स्वामी समर्थ इंजिनिअर्सचे भानुशाली या ठेकेदाराला मिळाले आहे. सदर काम 9 कोटी रुपयांचे असून सदर कामांची मूळ मुदत ऑक्टोबर-2025 मध्ये संपली असून वाढीव व अंतिम मुदत मे-2026 अखेर ही आहे. परंतु आजपर्यंत काम पूर्ण झालेले नाही.

आंदोलना दरम्यान अनेक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष खाडीत उतरून जवळपास दोन तास तीव्र आंदोलन केले. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू दिली नाही. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदारांनी तातडीने यंत्र-सामुग्री आणून काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्या नंतर ग्रामस्थांनी आपले निवेदन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

मात्र कामाची मुदत संपूनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. ग्रामस्थांच्या मते कामाची प्रगती अत्यंत मंद असून अंदाजे 40 टक्के कामही पूर्ण झालेले नाही. याच काळात उन्हाळ्यातील भरतीच्या वेळी तीन वेळा खाडीचे खारे पाणी शेतीमध्ये शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याबाबत नुकसान भरपाई देण्याबाबत ठेकेदाराने टाळाटाळ केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच मूळ ठेकेदाराने काम स्वतः न करता ते अनुभव नसलेल्या दुसऱ्या ठेकेदाराकडे सोपवल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या बाबत संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य दखल घेतली नसल्याने शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण झाले नाही तर शेती आणि कणे गाव व कणे परिसर पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी खारभूमी विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपअभियंता अतुल भोईर, कनिष्ठ अभियंता अश्विनी पाटील, पोलिस निरीक्षक जाधव, नंदाताई म्हात्रे, कणे संरपच सुगीता पाटील, उपसरपंच निकीता म्हात्रे, अनिल पाटील, तसेच परीसरातील ग्रामस्थ यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त उपस्थित होता.

कणे-कोप्रोली योजनेवरील उघाड्यांची व बंदिस्तीची कामे तातडीने सुरू करून एप्रिल-2026 अखेर पूर्ण होतील, असे ठेकेदाराला सांगितले आहे.
अजय भोईर, अभियंता, खारभूमी उपविभागीय
33 वर्षानंतर सदर बंदिस्तीचे नूतनीकरणाचे काम सुरु झाले आहे. परंतु काम नित्कृष्ठ दर्जाचे असून वेळेवर पूर्ण होताना दिसत नाही. येथील उघाडीचे कामाला पण सुरुवात झालेली नाही. आम्हाला ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आमचे आमचे जलसमाधी आंदोलन सुरुच राहील.
अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT