विक्रम बाबर
पनवेल : कामोठे शहरात गेल्या काही दिवसांत वाहनचोरीच्या घटनांनी अक्षरशः डोके वर काढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे केवळ पाच दिवसांच्या कालावधीत तब्बल चार दुचाकी वाहनांची चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने कामोठे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अद्याप देखील एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. सुझुकी एक्सेस, होंडा शाईन आणि टीव्हीएस एनटॉर्क यांसारख्या लाखो रुपयाच्या दुचाकी वाहनांची चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या सर्व घटना शहरातील वेगवेगळ्या भागांतून घडल्या असून चोरट्यांनी पोलिसांना थेट आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणांची नोंद कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली असली, तरी अद्याप एकाही आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही. विशेष म्हणजे सर्व चोरीच्या घटनेचे चित्रीकरण शहरात लावलेल्या सी सी टीव्ही मध्ये दिसून येत आहे, मात्र या चोराची ओळख पटवण्यात कामोठे पोलिस हतबल झाले आहेत.
कामोठे परिसरात दिवसाला एक ते दोन वाहन चोरीच्या घटना घडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. “वाहन पार्क करून ठेवताना आता भीती वाटते. सकाळी उठल्यावर वाहन जागेवर असेल की नाही, याची खात्री राहिलेली नाही,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक रहिवाशाने व्यक्त केली.
याशिवाय, केवळ एप्रिल महिन्यातच नव्हे, तर मार्च महिन्यातदेखील चार ते पाच दुचाकी चोरीच्या घटना नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ही समस्या तात्पुरती नसून सातत्याने वाढत चाललेली गुन्हेगारी असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, नागरिकांचा आरोप आहे की, पोलिस यंत्रणा खाजगी कामांमध्ये अधिक व्यस्त असल्यामुळे वाहनचोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष होत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणी, गस्त वाढवणे आणि संशयितांवर नजर ठेवणे या मूलभूत उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या जात नसल्याची टीका देखील स्थानिकांकडून होत आहे.
कामोठे पोलिसांकडून मात्र या प्रकरणांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली, तरी वाढत्या घटनांमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मधून दुचाकी चोरी
आदई वसाहती मधील रहिवाशी अभिषेक यांनी मुंबई येथे कामा निमित्ताने जाताना स्वतःच्या मालकीची टीव्हीएस एन्टर्क मोपेड दु चाकी खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मध्ये उभा केली होती, मात्र कामावरून आल्यानंतर ते पार्किंग मध्ये आले असता त्यांची दुचाकी पार्किंग मध्ये त्यांना दिसून आली नाही. त्यांनी शोध घेतला मात्र दुचाकी मिळून आली नाही ती मुळे त्यांनी कामोठे पोलिस ठाण्यात वाहन चोरीची तक्रार देखील नोंदवली, पोलिसांनी तपास सुरू केल्या नंतर चोरटा खुद्द पार्किंग चे पैसे भरून गाडी घेऊन जाताना दिसत आहे, मात्र कामोठे पोलिस सीसीटीव्ही बघून शांत बसल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे.