उरण: तरण तालुक्यातील जासई गावात तलावात आंंघोळीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकाच वेळी तीन निष्पाप जीवांचा अंत झाल्याने संपूर्ण जासई गावावर आणि उरण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.ही दुर्घटना शनिवारी घडली.
जासई गावातील एका तलावात तीन लहान मुली आंघोळीसाठी उतरल्या होत्या. मात्र, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने त्या अचानक खोल पाण्यात गेल्या आणि बुडू लागल्या. रेहानाखातून रमजाआली (वय ८), रवीना परवीन रमजाआली (वय ७ ), सौम्या कन्हैया कुमार (वय १२ ) अशी या मुलींची नावे आहेत.
मुली बुडत असताना झालेल्या आरडाओरड्यानंतर स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तात्काळ तलावाच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी तातडीने तिन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा श्वास थांबला होता. डॉक्टरांनी तपासणी अंती तिघींनाही मृत घोषित केले. मृत पावलेल्या तिन्ही मुली मूळच्या उत्तर प्रदेश येथील रहिवासी होत्या. सध्या त्या उरण येथील जासई गावातील 'इस्माईल यांच्या चाळीत' आपल्या कुटुंबासह राहत होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची नोंद उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा पाण्याच्या ठिकाणी लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.