इर्शाळवाडी दुर्घटनेची वर्षपूर्ती; उरातले दु:ख घेऊन जगत आहेत वारसदार pudhari photo
रायगड

Irshalwadi Landslide | इर्शाळवाडी दुर्घटनेची वर्षपूर्ती; उरातले दु:ख घेऊन जगत आहेत वारसदार

नेमकं काय घडलं होतं?

पुढारी वृत्तसेवा
खालापूर : मनोज कळमकर

इर्शाळवाडी दुर्घटनेला शुक्रवारी ( 19 जुलै) एक वर्ष पूर्ण होत आहे.या दुर्घटनेच्या कटु आठवणी जगत इर्शाळवाडीचे उरलेले नागरिक दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या आठवणीवर जगत आहेत. त्यांच्या या वेदना पाहिल्या की उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या या कविवर्य सुरेश भटांच्या दर्दभर्‍या गझलची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

  • 19 जुलै 2023 ला रात्री झोपी गेलेल्या वाडीवर निसर्गाचा प्रकोप झाला आणि होत्याचे नव्हते झाले.

  • 45 कुटूंबाची हसती खेळती वाडीतील दुर्घटनेत शासनाकडून 27 जणांना मृत घोषित करण्यात आले असून 57 बेपत्ता नोंद करण्यात आली होती.

  • गाडले गेलेल्या अनेकांचे मृतदेह शोधणे कठीण झाल्यामुळे शोध कार्य चौथ्या दिवशी थांबवण्यात आले होते.

  • डोंगराच्या कुशीत सोलर उर्जेवर प्रकाशमान होणारी इर्शाळवाडी वर्षभरापूर्वी झालेल्या दुर्घटनेने नकाशावरून पुसून गेली आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील इर्शाळगड पर्यटकांना कायम खुणावत राहिला. दुर्घटनेच्या दिवशी देखील पर्यटक मोठ्या संख्येने गडावर होते. पाऊस जास्त असल्याने. संध्याकाळी सहा साडेसहाला पर्यटक गडावरून उतरले होते. काळरात्री वाडीतील काही तरुण पोरं बंद असलेल्या शाळेमध्ये पब्जी खेळण्यात गुंग होती .रात्री साडे अकराच्या सुमारास कानठळ्या बसणार आवाज झाला आणि काही कळायाच्या आतच जवळपास 40 घरांवर दगड माती आणि मोठ्या झाडांचा ढिगारा कोसळला. शाळेत बसलेल्या मुलानी वाडी कडे धाव घेतली आणि समोरच्या दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अंधारात वाडीतील काही कुटुंब वाट दिसेल तिकडे पळत होता. किंकाळ्या, रडण्याचा आवाज कोसळणार्‍या पावसाला देखील चिरत होता. समय सूचकता दाखवून तरुणाने वाडी खाली असणारा चौक गावातील तरुणांशी संपर्क साधून घडलेली हकीकत सांगितली. जीव वाचून जवळपास 40 ते 50 जण रात्रीच्या अंधार गडाच्याखाली आले होते. गाडलेल्या घरातून किंकाळ्या आणि रडण्याचा आवाज काही मिनिटातच मातीच्या ढिगाराखाली दबून गेला. मुसळधार पावसात आपत्कालीन यंत्रणेने गडावर धाव घेत सुरू केलेले मदत कार्य वाखाणण्याजोगे होते आपत्कालीयंत्रणेचे प्रमुख खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यासह अपघात ग्रस्त मदत पथक आसपास गावातील अनेक सामाजिक संस्था तरुण मुसळधार पावसात गडावर मदतीसाठी पोहोचले होते. मदत कार्य सुरू असताना पुन्हा डोंगराचा काही भाग कोसळल्याने झालेल्या प्रचंड आवाजात पुढे देखील न डगमगता जखमीना गडाखाली नेण्याची तळमळीतून अनेक जीव वाचले होते.

इर्शाळगड तग धरू शकला नाही

इर्शाळगडावरिल दरडीने कित्येक वर्षे अंगाखांद्यावर खेळलेल्या कुटुंबाना निर्वासित केले असून 57 जणांना कायमचे पोटात घेतले आहे. 3500 फुटावर घडलेल्या दुर्घटनेत निसर्गाचा रूद्र अवतारात देखील काही साधनसामग्री नसताना देखील ज्या पद्धतीने मदतकार्य दोन तासात सुरू झाले त्याची नोंद घेण्यासारखी आहे. तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील माणिकगड नंतर इर्शाळगड पर्यटकांना कायम खुणावत राहिला. परंतु याठिकाणी राहणा-या वाडीत नागरी सोयी सुविधांची कमतरता यामुळे पुनर्वसनासाठी हालचाली सुरू होत्या परंतु त्या आधीच दु:खाचा डोंगर कोसळला. परंतु निसर्गाची आपत्ती अचानक नव्हती. पाच वर्षापूर्वी इर्शालगडावर कड्यावरिल मोठ मोठे दगड कोसळून अडकून पडले होते. त्यामुळे गडाच्या कड्याकडे जाणारी वाट बंद झाली होती. परंतु गांभीर्याने या घटनेकडे न पाहिल्याने ढासळणारा इर्शाळगड रेकार्ड ब्रेक पावसात तग धरू शकला नाही.

नवीन इर्शाळवाडीची निर्मिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरत्या कंटेनर वसाहतीत दोन वेळा भेट देत पुनर्रचनासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. इर्शाळवाडी कुटुंबात तात्पुरता स्थलांतर कंटेनर वसाहतीत करण्यात आल्यानंतर प्रशासनाने वर्षभर पूर्णपणे कुटुंब प्रमाणे त्यांची काळजी घेतली आहे. या ठिकाणी 24 तास पाणी ,वीज ,आरोग्यसेवा, मोफत रेशन, मोफत गॅस सिलेंडर यासारख्या सोयी सुविधा पुरवल्या आहेत शिवाय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनने 18 मुलांना दत्तक घेतले .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT