रायगड: भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरातील जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवसांचा (१८ मे ते २२ मे २०२६) अधिकृत हवामान अंदाज जाहीर केला आहे.
या अंदाजानुसार, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याचा 'यलो अलर्ट' देण्यात आला असून, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात पुढील तीन दिवस म्हणजेच १९ आणि २० मे रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. २१ आणि २२ मे रोजी मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला पुढील २४ तास दक्षतेचे राहतील. १९ मे रोजी जिल्ह्यात वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २० मे रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, तर २१ आणि २२ मे रोजी हलक्या सरी बरसतील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान अधिक सक्रिय राहील. १९ आणि २० मे या दोन्ही दिवशी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते मध्यम पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २१ आणि २२ मे रोजी जिल्ह्यात हलका पाऊस अपेक्षित आहे.
ठाणे जिल्ह्यात काल (१८ मे) विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला. मात्र, आज म्हणजेच १९ मे ते २२ मे या पुढील चार दिवसांच्या काळात ठाणे जिल्ह्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात पुढील पाचही दिवस (१८ मे ते २२ मे) हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाही.
शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आवाहन
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह होणाऱ्या या पावसामुळे आंबा, काजू तसेच काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच वादळाच्या वेळी झाडांखाली किंवा खुल्या मैदानात आश्रय घेणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.