Houses damaged due to mountain excavation in Mandla
रायगड : पुढारी वृत्तसेवा
मुरुड तालुक्यातील मांडला परिसरात एका कंपनीने येथील डोंगर जेसीबी आणि पोकलेन यंत्रांने पोखरून काढला आहे. या डोंगरखोदाईमुळे आणि नैसर्गिक नदी-नाल्यांच्या प्रवाहामध्ये माती व दगड टाकून सपाटीकरणाच्या नावाखाली ते बुजवून टाकल्याने डोंगराखालील शेतकरी मोठ्या नुकसानीचा सामना करत आहेत.
25 ते 28 मे रोजी मांडला परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. डोंगरात खोदलेली आणि भूसभुशीत झालेली माती पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात वाहून खाली पायथ्याशी आली. याचा थेट फटका येथील काही ग्रामस्थांच्या बागेला बसला आहे.
बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यांच्या बागेतील घरात पाणी आणि चिखल साचला आहे. ही परिस्थिती माळीणसारख्या दुर्घटनेची आठवण करून देणारी आहे. त्यांचे घर कोसळण्याच्या अवस्थेत असून, बागेतील आंब्याची आणि सागाची झाडे मोडून पडली आहेत. विशेष म्हणजे, बोअरवेल मातीच्या ढिगार्याखाली गाडली गेली असून, पाण्याची मोटार पाण्यात गेल्याने निकामी झाली आहे.
कंपनीने खोदलेली माती मांडला ते बेलवाडी या रस्त्यावर आल्याने तो रस्ता अत्यंत निसरडा झाला असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. केवळ मनुष्यजीवनच नाही, तर जंगलातील सजीवांनाही या मनमानी कारभाराचा फटका बसला आहे. रानपाखरांचा विसावा नष्ट झाला असून, अनेक पशू डोंगर सोडून गावाकडे वस्तीवर येऊ लागले आहेत. कंपनीच्या या बेजबाबदारपणामुळे पर्यावरणाचे संतुलन पूर्णतः बिघडले आहे. या गंभीर परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत.
घराभोवती दोन फुटांपर्यंत मातीचा ढिगारा साचल्याने ग्रामस्थ कैलास पिंगळे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर नुकसानीनंतरही कंपनीचे कर्मचारी कोणतीही दयामाया न दाखवता हात झटकून मोकळे होत असल्याचा आरोप पिंगळे यांनी केला असून, त्यांनी तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे. आता ते महसूल विभागाकडून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.