अलिबाग : सुवर्णा दिवेकर
नसर्गानं भरभरुन दिलं,पण पावसाने घात केला आणि उन्हाळी भातपिक डोळ्यासमोर वाहून गेलं... असं विदारक दृष्य रायगडातील बळीराजाला पहावे लागले. रायगड जिल्हयात मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात आंबा, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या नजर पाहणीत जिल्हृयात 452 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पंचनाम्यांचे काम कृषी विभागाने हाती घेतले आहे. उन्हाळी भातपीकाला सर्वाधिक फटका बसला असून पीक हातचे गेल्याने शेतकरयांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.
यावर्षी पहिल्यांदाच अवकाळी पावसाने मे महिन्यात जोरदार बरसात केली. अवकाळीचा जोर ओसरण्यापूर्वीच मान्सून दाखल झाला. आणि मान्सूनच्या पावसाने आपल्या आगमनाची वर्दी देताना रायगडकरांना बेजार करून सोडले. वादळी वारयांसह जोरदार बरणारया पावसाने रायगडला अक्षरशः झोडपून काढले. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकरयांना बसला.
मे महिन्याच्या अखेरीस जिल्हयात उन्हाळी भातशेतीची कापणी सुरू होती. काही ठिकाणी कापणीची कामे सुरू होती. तर काही भागात कापणी व्हायची होती परंतु त्यापूर्वीच आलेल्या पावसाने सगळं वाहून नेलं. उभे पीक शेतात आडवे झाले. आता या दाण्यांना मोड आले आहेत.
रायगडमध्ये कर्जत, पेण, रोहा आणि माणगाव बरोबरच खालापूर आणि पाली तालुक्यात काही प्रमाणात उन्हाळी भातपीक घेतले जाते. या तालुक्यातील कापलेल्या उन्हाळी भातपीकांचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले. तर याच तालुक्यात काही प्रमाणात भाजीपाल्याचे नुकसान झाले. पोलादपूर , उरण, पनवेल कर्जत या चार तालुक्यातील आंबा पीक अवकाळीने धोक्यात आले. यात प्रामुख्याने फळगळती, देठकुजवा आणि फळामध्ये साका पडल्याने फळे फेकून देण्याची वेळ बागायदारांवर आली. मात्र यंदा आंब्याचा हंगाम लवकर संपल्याने या नुकसानीचे प्रमाण तुलनेत कमी आहे.
- वंदना शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीसर्व क्षेत्रीय कर्मचार्यांना आपापल्या भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या जो अहवाल आला आहे तो नजर पाहणी अहवाल आहे. काही तालुक्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच नुकसानीचा अंदाज येईल.